Raj Thackeray: कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? खरात प्रकरणावरुन राज ठाकरे संतापले; राजकारण्यांना थेट सवाल

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणावरून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजव्यवस्थेवर टीका केली आहे. संत परंपरेचा वारसा असलेल्या राज्यात अंधश्रद्धा आणि राजकीय स्वार्थ वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Raj Thackeray Ashok Kharat Case
Raj Thackeray Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

Raj Thackeray Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

त्यांनी खरात प्रकरणातील हिडीस तपशील वाचून शब्दशः "गरगरल्यासारखं झालं" अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अशा नीच माणसाने राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालावा, हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?": महाराष्ट्राला संतांची आणि प्रबोधनकार ठाकरेंसारख्या समाजसुधारकांची मोठी परंपरा लाभली आहे. पण आज त्याच महाराष्ट्रात राजकारणी लोक तर्काला तिलांजली देऊन अशा भोंदू बाबांच्या भजनी लागतात, यावरून राज ठाकरेंनी "कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?" असा सवाल उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंची पोस्ट

''अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.

ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.

हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.

आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.

आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.

या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.

पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.

राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.

जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.

माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.

मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे. ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्स राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा.

तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही.''

राज ठाकरे ।

माध्यमांनाही त्यांनी आवाहन केलं की, अशा प्रकरणांवर केवळ सनसनाटीपणा न करता शेवटपर्यंत पाठपुरावा करावा आणि दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण जिवंत ठेवावं.

शेवटी त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही चिंता व्यक्त केली. महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि ड्रग्ससारख्या समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्यथा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि नैतिक अधःपतनाला थांबवणं कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरेंच्या या पोस्टमुळे खरात प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news