

रायगड : रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2025 या 5 वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात महिला शारीरिक अत्याचाराचे 508 व विनयभंगाचे 666 असे एकूण 1 हजार 174 गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास जिल्ह्यातील महिला सुरक्षित नसल्याचे सत्य समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यात महिला महिला सुरक्षीत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे वाढले असून, दर आठवड्याला सरासरी चार ते पाच महिला या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना गजाआड करण्यात यश आल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून, 98.80 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी, नको तिथे स्पर्श करून लज्जा उत्पन्न करणारे कृत्य असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. तर लग्नाचे अमिष दाखवून, नोकरीत बढती देण्याचे अमिष तसेच इतर प्रकारे शारीरिक संबंध प्रस्तापित करुन केल्याच्या तक्रारीही दाखल होत आहे. पूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला बदनामीला घाबरून गप्प बसत असत. मात्र आता महिला आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज ऊठवू लागल्या आहेत. त्या पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करु लागल्या असल्याचे दाखल तक्रारींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते.
जिल्ह्यात मागील पाच वर्षात बलात्कार व विनयभंगाचे 1174 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. यामधील 98.80 म्हणजे 1 हजार 160 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस विभागाने यश मिळविले आहे. मागील पाच वर्षात बलात्काराच्या 508 गुन्हांपैकी 507 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, विनयभंगाच्या 666 गुन्ह्यांपैकी 653 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस विभागाला यश मिळाले आहे.
रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्र किनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरु असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून, या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटना स्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.