

Who Is D B Patil Information in Marathi
रायगड: जयंत धुळप
दिनकर बाळू तथा दि.बा. पाटील यांचे नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या निमित्ताने दि.बा.पाटील यांचे नाव आज जगभरात पाेहाेचते आहे. शिक्षक माता-पित्यांच्या अत्यंत सर्वसामान्य कुटूंबातील दि.बा.पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यांतील जासई या छाेट्या गावांत झाला. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आपले संपूर्ण आयूष्य वेचलेले दि.बा.पाटील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते हाेते. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला हाेता.
दि.बा. पाटल यांचे वडील बाळू गौरू पाटील हे शेतकरी आणि शिक्षक होते. तर माताेश्री माधूबाई या देखील शिक्षिकाच हाेत्या. परिणामी घरात शिक्षणास प्राधान्य देण्यासाठीचेच वातावरण हाेते. दि.बा. पाटील यांच्या आईवडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. मात्र अशा परिस्थितीत दि.बा. पाटील यांचे शिक्षण मात्र अत्यंत खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनी देखील दि.बा यांच्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला. दरम्यान दि. बा. पाटील यांच्या पत्नी ऊर्मिला यांनी आपल्या सासू-सासऱ्यांची शिक्षकाची परंपरा अबाधित राखली, त्या पनवेल येथील के.व्ही. कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या.
दि.बा. पाटील यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द अत्यंत धगधगती आणि राज्याच्या राजकीय क्षेत्राला अचंबीत करणारी अशीच आहे. दि.बा. पाटील हे पनवेल नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष हाेते. कुलाबा लोकल बोर्डचे सदस्य होते. महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ५ वेळा आमदार, एकदा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य ,महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगड लाेकसभा मतदार संघाचे दोन वेळा खासदार हाेते.
महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात त्यांनी अकरा महिन्यांचा करावास भोगला हाेता. महाराष्ट्र विधान सभेत अनेक महत्वाच्या कायद्याच्या मसुदा मंजुरीसाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. दि.बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्त्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.
सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दिबांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला त्यावेळी लाखोंच्या संख्येने प्रतिसाद देणारे कार्यकर्ते होते.
आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेवटपर्यंत कष्टकऱ्यांसाठीच लढले.
राजकारणातून निवृत्ती पण समाजकार्य कधी थांबलंच नाही
दि.बा. पाटील काही तात्विक मुद्यावरुन पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात आले. मात्र, त्या नंतर ते सक्रिय राजकारणातून मात्र निवृत्त झाले. मात्र शेतकऱी आणि कष्टकऱ्यांबराेबरची नाळ त्यांची अखेर पर्यंत जाेडलेली हाेती. दि. बा. पाटील देव मानत नसत. मात्र, अंधारात पडलेल्या आपल्या आगरी समाजासाठी काहीतरी करण्याच्या त्यांच्या ऊर्मीनेच आगरी समाज वाचला. त्यांचा कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, आगरी समाजातल्या मोठमोठे साखरपुडे, मद्यासह हळदी समारंभ यांसारख्या काही चालीरीतींना विरोध होता.
- १३ जानेवारी १९२६ – जन्म -जासई- पनवेल,रायगड.
- १९५७ – शे.का.प.चे मध्यवर्ती चिटणीस. शे.का.प.च्या अनेक पदांवर कार्य.
- १९५७-१९६२,१९६२-१९६७,१९६७-१९७२,१९७२-१९७७,१९८०-१९८४ – असे पाच वेळा विधानसभेवर विजयी
- १९६०- पहिले हायस्कूल जासई गावात सुरू केले.त्यानंतर १० माध्यमिक शाळा सुरू केल्या.
- १९६७ ते १९७२ -महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष.
- १९७० – पनवेल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्थापन केले.
- १९७० पासून सिडकोचा शेतकरी लढा.
- १९८४ चा सिडको लढा देशभर गाजला. प्रकल्पग्रस्तांना “साडेबारा टक्के" जमीन माेबदल्याचा लाभ झाला.
- १९७२-१९७७- विधानसभेचे पक्ष प्रतोद, अंदाज समिती,लेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आदि. समित्यांवर लक्षवेधी काम केले.
- १९७४- पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.
- १९७५-च्या बेळगांव सीमा प्रश्न आंदाेलनात सक्रीय, ११ महिन्याचा कारावास.
- १९८२-८३- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.
- १९७७-१९८४-खासदार म्हणून २ वेळा निवडून आले.
- १९९६ - महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार.
- “आगरी दर्पण” मासिकाचे नियमित प्रकाशन सुरू केले.
- म.फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक.
- आगरी कोळी कराडी अशा भुमीपुत्रांचे श्रद्धास्थान, मार्गदर्शक, लोकनेते.
- २०१३ - पनवेल येथे त्यांच्या राहत्या घरी २४ जून २०१३ रोजी निधन.