

महाड ः मागील काही दिवसात हवामानातील झालेल्या बदलाचा दृश्य परिणाम महाड मधील 907 हेक्टर आंबा लागवडीवर झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे यांनी दिली असून यापैकी वर्षा आड मोहर धरणाऱ्या जुन्या बागांमधील 750 हेक्टर जागा तर मोहोर खराब होऊन गळ झालेली व फळगळ झालेली 550 हेक्टर आंबा येथे जागा या हवामानाच्या बदलाला बळी ठरल्याचे वास्तव समोर आले आहे.
तालुक्याच्या मोहोत येथील सखाराम मोरे बबन मोरे सुभाष चौधरी प्रगतिशील शेतकरी बबन मोरे यांनी यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना हवामानातील झालेला बदलाने यावर्षी सर्वोत्कृष्ट झालेला आंब्याचा मोहर काळा पडला असून निम्म्यापेक्षा मोहोर गळून पडल्याने यावर्षी आंब्याचे उत्पादन फार कमी प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली.
दरम्यान कोकण विभागात कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने फळ पिक विमा योजनेअंतर्गत या झालेल्या दुर्दैवी घटनेची त्वरित दखल घेऊन तातडीने संबंधितांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
कृषी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी
मागील काही दिवसात तालुक्याच्या विविध भागांमध्ये मोहर काळा पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे ,तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे यांनी मंडल कृषी अधिकारी उप कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या समवेत तालुक्याच्या विविध भागात प्रत्यक्ष केलेल्या पाहणी दरम्यान ढगाळ हवामान व धोक्याच्या वाढलेल्या प्रमाणाने आंब्याचा मोहोर काळा पडल्याचे तसेच वाटाण्यासारख्या आलेल्या आंब्याच्या फळाचा गळ झाल्याची माहिती धीरज तोरणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.