

संध्या पिंगळे
तळा: तळा नगर पंचायत क्षेत्रात नागरिकांना एक दिवसा आड एक ते दिड तास पाणी मिळत असल्याने तळा वाशीयांची ही एक नेहमीची पाणी समस्या असून त्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. तळा शहरासाठी अंबेली येथील बोअरवेलच्या माध्यमातून खेच पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो तसेच दुसरे तहसिल कार्यालया जवळील धरणाच्या खालील भागात मारलेल्या बोरवेल द्वारे पाणी पुरवठा केला जातो.
सध्या एप्रिल, मेपासून एक, दोन, तर काही वेळा तीन दिवसांनी पाणी मिळते तेही एक ते दीड तास पाणी मिळते. काही भागात तर अर्धातास पाणी अशा या पाणी समस्येमुळे महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असून महिलांमधून नाराजी व्यक्त होताना पहावयास मिळत आहे.
तळा शहरातील तहसिल जवळील बोरवेल द्वारे श्रीस्वामीसमर्थ नगर तळा - इंदापूर रस्त्या लगत असलेल्या नवीन वसाहत भागात मे महिना सुरु झाल्यापासून दोन ते तीन दिवसांनी पाणी सोडले जात असून एक तास पाणी मिळत असल्याने या भागातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दोन ते तीन दिवसांनी गेले अनेक दिसांपासून पाणी येत आहे.
या येणाऱ्या पाण्याला वेग नसल्याने कशेबशे थोडेसे पाणी मिळते ते तुटपुंजे पडते. तसेच तळा शहरातील अनेक भागातही अशीच परिस्थिती असल्याचे महिला वर्गातून नाराजीचे सूर निघत आहेत. अशावेळी नाईलाजास्तव खाजगी पाणी पुरवठा करणाऱ्यांकडून विकत पाणी घ्यावे लागत आहे.
याचा विचार करता नगरपंचायतीने याकडे लक्ष घालून पाणी समस्या या सोडवावी अशी संतापजनक अपेक्षा या भागातील महिलांमध्ये व्यक्त होत आहे. तळा शहराची एक दिवसा आड येणारे पाणी समस्या निकाली निघेल तरी केव्हा अशी कुजबूज महिला वर्गातून ऐकावयास मिळत असून नवीन योजना तळ्यासाठी कोणी आणेल का याकडे अनेक वर्षांपासून महिलावर्गाचे डोळे लागून राहिले होते.
पाणी योजनेच्या कामाकडे अभियंत्यांनी योग्य व दर्जेदार लवकरात लवकर काम करून घ्यावे अशी अपेक्षा संताप व्यक्त करत महिला वर्गातून बोलले जात आहे. तसेच ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यादृष्टीने कोणीच लक्ष देत नसल्याची चर्चा महिलांतून ऐकावयास मिळत आहे. हि योजना पुर्णत्वास जाईल का असा प्रश्न समोर येत आहे. या नवीन योजनेचे पाणी एप्रिल पर्यंत मुबलक पाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती मात्र ती फोल ठरली आहे.
योजनेचे काम कुर्मगतीने
तळ्याची पाणी समस्या कायम सुटेल यादृष्टीने तळा शहरासाठी १३ कोटींची योजना मंजूर झाली. या योजनेचे भूमिपूजन तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते १७ फेब्रुवारी २०२४ रोजी भूमीपूजन झाले. या योजनेचे काम कुर्मगतीने चालू असून दोन वर्ष झाली तरी अद्याप या योजनेचे काम झाले नाही. हे काम योग्य पध्दतीत व नियमानुसार होत आहे का असा प्रश्नही सामान्य नागरिकांतून केले जात आहे.