

श्रीकृष्ण बाळ
महाड: मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुल दुर्घटनेची दहा वर्षे पूर्ण होत असतानाच महाडकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या फुलांच्या भिंतीवर मोठे वृक्ष निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा सावित्री पूल कमकुवत होऊन दुर्घटना होण्याची भीती प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी बोलून दाखविली.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड जवळील सावित्री पुल 2 ऑगस्ट 2016 रोजी रात्री कोसळून मोठी दुर्घटना घडली त्यात 40 जणांना जलसमाधी मिळाली. या घटनेला आता 11 वर्षे झाली. ही घटना घडल्यानंतर वर्षभराच्या आत या ठिकाणी नवीन पूल बांधून वाहतुकीस खुला करण्यात आला.
मात्र आता या पुलाच्या 11 वर्ष बांधणीनंतर याच पुलाच्या मुंबई कडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या डाव्या बाजूला भले मोठे वटवृक्ष व इतर वृक्ष उगवले आहेत. या पुलावरून लाखोंच्या संख्येने प्रवासी रात्री अपरात्री प्रवास करत असतात. या उगवलेल्या झाडांमुळे या पुलाला तडे जाऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा दुर्घटना घडून अनेकांना प्राण गमवावे लागणार असल्याचे चित्र या पुलाच्या भिंतीला उगवलेल्या वृक्षांकडे बघून दिसत आहे.
दुर्दैवाने अशी घटना घडल्यास त्यास राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहील का असा सवाल विचारला जात आहे तर पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे लाखो रुपये खर्च केले जातात मात्र या कडे बघून कशा पद्धतीची देखभाल केली जाते यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ऑगस्ट 2016 मध्ये कोसळलेल्या पुलाच्या जागी नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण 5 जून 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते.