

पेण: प्रत्येकाने नियमांचे पालन करून वाहने चालवली तर रस्त्यावर अपघात होणार नाहीत असे उद्गार पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल यांनी पेण तालुक्यातील जिते येथे रस्ता सुरक्षितता मोहिमेच्या समारोप प्रसंगी बोलताना काढले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण यांच्यावतीने रस्ता सुरक्षितता अभियान समारोप व मान्यवरांचा सत्कार समारंभ जिते येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी प्रतिभा पवार, विक्रम संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, वाहतूक सेनेचे अध्यक्ष हरीश बेकावडे, संजय साबळे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय घरत, मंगेश नाईक यांच्यासह परिवहन अधिकारी कर्मचारी, विक्रम तसेच रिक्षा संघटनेचे चालक-मालक, इतर मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांनी आपल्या देशात व राज्यात महामार्गांवर दरवर्षी अनेक अपघात होतात. त्यात अनेकांचा जीव जातो. हे अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षितता अभियान सुरु करण्यात आले आहे.
त्यामुळे अपघात कमी झाले आहेत. या मोहिमेत आम्ही सामाजिक संस्था, विक्रम, रिक्षा संघटना यांचे सहकार्य घेतले आहे. यात ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत असल्याचे सांगून प्रत्येकाने काळजी घेतली तर अपघात कमी होतील असे स्पष्ट केले.
हरीश बेकावडे यांनी हा चांगला उपक्रम परिवहन कार्यालय राबवत आहे. प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, अपघात कमी होतील असे स्पष्ट केले. तर विजय पाटील यांनी शिस्त हाच पर्याय आहे. शिस्तीने वाहन चालवल्यास अपघात टळतील. त्यामुळे शिस्तीचा जीवनात अंगीकारण करा.
तर मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे हा अभ्यासाचा विषय आहे. हा 17 वर्षे होऊन देखील महामार्गाचे काम अद्यापि पूर्ण होऊ शकले नाही याला भ्रष्टाचार कारण आहे असे सांगून विक्रम व मिनिडोअरसाठी एन्शुरन्स कंपन्या इनशूरन्सचे पैसे देत नाहीत त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे एन्शुरन्स उपलब्ध करून मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.
यावेळी अलिबाग जवळील बेली खाडीत गाडीसह गेलेल्या चार जणांना वाचवलेल्या चौल येथील रिक्षा चालक प्रवीण शिंदे याचा तसेच अपघात रिल्स, विना अपघात सेवा केलेल्या चालक, मदत करणाऱ्या व्यक्ती, विदयार्थी, संस्था यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी जालेंदर नारकुल यांनी वाहन चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवणारे अपघात होतात. एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी प्रथम पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच परिवहन खात्याचे कर्मचारी पोहोचतात. अपघात झाल्यास त्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त होते.
दरवर्षी शासन अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षितता मोहीम अभियान राबवते या जनतेचे पैसे खर्च होतात. याचे भान ठेऊन प्रत्येकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन वाहन चालवावे व अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.