

रायगड : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारतीय हवामान विभागातर्फे रायगड जिल्ह्यासाठी आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, 14 व 15 मार्च रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, त्यानंतर हवामान उष्ण व दमट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, 14 ते 18 मार्च या आगामी पाच दिवसांत पावसाची शक्यता नाही, मात्र 14 व 15 मार्च रोजी कमाल तापमानात वाढ होईल, मात्र 16 मार्चपासून कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत कमाल तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी विविध पिकांसाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे जंगलात वणवा लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आंबा व काजू बागांभोवती वणवा निरोधक पट्टे काढावेत. आंबा फळधारणा झाली असल्यास प्रति झाड 150-200 लिटर पाणी 15 दिवसांच्या अंतराने द्यावे. तसेच, फळमाशीपासून संरक्षणासाठी एकरी 2 फळमाशी रक्षक सापळे लावावेत.
उन्हाळी भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत असल्याने प्रति गुंठा 875 ग्रॅम युरिया द्यावा आणि खाचरातील पाण्याची पातळी 5 सें.मी. पर्यंत राखावी.कलिंगडाच्या फळांचे प्रखर सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी ती पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत. भेंडी, मिरची आणि वांगी पिकांना गरजेनुसार 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
वाढत्या उष्णतेमुळे जनावरांना दुपारच्या वेळी चरण्यासाठी बाहेर सोडू नये. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी त्यांना स्वच्छ व थंड पाणी द्यावे आणि पिण्याच्या पाण्यात 1टक्का गूळ व 0.5टक्का मीठ मिसळावे.कोंबड्या व अन्य पक्ष्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या छतावर गवत किंवा नारळाच्या झावळ्या टाकाव्यात आणि पाणी पिण्याच्या भांड्यांची संख्या वाढवावी.
तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर आवश्यक तत्काळ उपाययोजना जाणून घेणे व मार्गदर्शनाकरिता शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, आवाहन विद्यापीठाने केले आहे.