

महाड : राजकारणात वारसा मिळतो, पण नेतृत्व सिद्ध करावे लागते. महाड विधानसभा मतदारसंघ आज हाच फरक अनुभवत आहे. ज्यांनी संघर्षातून, जनतेच्या विश्वासातून आणि विकासाच्या ध्यासातून महाडला दिशा दिली, त्या मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विकासशेठ आज केवळ वारसदार म्हणून नाही, तर सक्षम आणि परिणामकारक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.
मंत्री गोगावले यांनी महाडच्या राजकारणात विकासाची, पारदर्शकतेची आणि जनतेशी थेट संवादाची परंपरा रुजवली. ही परंपरा पुढे नेताना विकासशेठांनी केवळ ती जपली नाही, तर बदलत्या काळानुसार तिला अधिक गती, व्यापकता आणि परिणामकारकता दिली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधा अशा अनेक विकासकामांमध्ये त्यांची ठाम भूमिका आणि पाठपुरावा स्पष्टपणे दिसून येतो.
महाड मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावणे, निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रशासनाला गतिमान ठेवणे, हे विकासशेठांच्या कार्यशैलीचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. विकास म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसणारे बदल, ही त्यांची भूमिका असल्यामुळेच अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. सामान्य नागरिकाच्या प्रश्नापासून ते मोठ्या विकास आराखड्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांची सक्रियता जाणवते.
राजकीयदृष्ट्या पाहता, विकासशेठ हे निर्णयक्षम आणि स्पष्ट भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करत आहेत. मतदारसंघाच्या हितासाठी ठामपणे भूमिका मांडणे, गरज पडल्यास प्रशासनाला जाब विचारणे आणि विकासासाठी संघर्ष करण्याची तयारी, यामुळे त्यांची प्रतिमा अधिक भक्कम होत आहे. त्यामुळेच महाडची जनता आज त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. भरत गोगावले यांचा अनुभव आणि विकासशेठ यांची कार्यक्षमता यांचा संगम महाड विधानसभा मतदारसंघासाठी स्थिर, सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व देत आहे, हे निश्चित. असेच मत तालुक्यातील जनसामान्य व्यक्त करीत आहेत.