महाड, पुढारी वृत्तसेवा : किल्ले रायगड परिसरात रविवारी ( दि. ७) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसादरम्यान रायगड वाडी येथील ४० वर्षीय युवक मनोज खोपकर धबधब्याजवळून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. बुधवारी (दि. १0) दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह वाघेरी गावाजवळील काळ नदी पात्रात शोधपथकाला सापडला.
रायगड किल्ल्यावर ढगफुटी झाल्याने रायगड किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले होते. याच दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगड वाडी गावातील मनोज खोपकर तरुण टकमक टोकाच्या खाली आपल्या मित्रांसह कोसळणाऱ्या धबधब्या मध्ये आंघोळ करण्यास गेला होता. त्यादरम्यान तो वाहून गेला होता.
मागील दोन दिवस एनडीआरएफ टीम, अपदा मित्र, सिस्केप संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रायगडपासून ते बाणकोट खाडीपर्यंत त्याचा शोध सुरू होता. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर वाघेरी गाव हद्दीतील काळ नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी सापडला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बिरवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.