

श्रीवर्धन शहर : अनिकेत मोहित
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच श्रीवर्धन तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे अनेक ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन झाले नसल्याचे चित्र समोर येत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांची पूर्वतयारी करण्यात प्रशासन आणि संबंधित ग्रामपंचायती कमी पडल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी विहिरींची साफसफाई करण्यात आलेली नाही, तर काही पाणीपुरवठा योजना अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने त्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
सध्या अनेक गावांमध्ये नागरिकांना स्वतःच्या पैशाने टँकर अथवा विकतचे पाणी घेऊन दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. पाण्यासाठी होणारी ही धावपळ नागरिकांच्या आर्थिक आणि मानसिक त्रासात भर घालत आहे.
दरम्यान, संबंधित कार्यालयाकडून माहिती घेतली असता अनेक ठिकाणी जल जीवन मिशन योजना अद्याप पूर्ण झालेली नसून काही योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित झालेल्या नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असून, "सर्वसामान्य नागरिकांनी पाण्यासाठी अजून किती दिवस वणवण करायची?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने केवळ कागदोपत्री आढावे न घेता प्रत्यक्ष गावागावात अधिकारी पाठवून पाणी उपलब्धतेची सद्यस्थिती तपासावी, बंद असलेल्या योजना सुरू कराव्यात, विहिरींची स्वच्छता करावी आणि तातडीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जलजीवन योजना रखडल्या
जल जीवन मिशनच्या कामांमध्ये झालेल्या विलंबामुळे तसेच काही ठिकाणी कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, या योजनांमध्ये पारदर्शकता आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.