

स्वप्नील पाटील
पेण: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जवळपास १०,५०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. मात्र यावेळी उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली होती.
मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि बी बियाण्यांचे सहकार्य केल्याने आज पेण तालुक्यातील जवळपास ७५ टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कृषी विभागाने ८० टक्के हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक राबविल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे.तालुक्यातील शिवारं आता हिरव्यागार भात लावणीने फुलून गेलेली आहेत.
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिका नष्ट झाल्यामुळे यावर्षी दरवर्षीपेक्षा कमी लागवड होण्याची शक्यता दिसून येत आहे.
यासोबत कृषी विभागाचे माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजेनीच्या माध्यमातून ८० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक राबविण्यात येत असून त्यासाठी रत्नागिरी- 8 या कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी संशोधित जातीचे ओळीत पुनर्लागवड, श्री पद्धत, पट्टा पद्धत यासारख्या आधुनिक पद्धतीच्या लागवडीबाबत प्रत्यक्ष शेतीमध्ये उतरून कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
पावसाने यंदा उशिरा बरसायला सुरुवात करून त्यानंतर झालेल्या अतिवृष्टी मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असली तरी कृषी विभागाने घेतलेले संशोधित जातीचे ओळीत पुनर्लागवड, श्री पद्धत, पट्टा पद्धत यांसारख्या लावणीच्या पद्धतीच्या अनेक हिताचे योग्य निर्णय आणि शेतकऱ्यांनी त्या निर्णयानुसार विविध ठिकाणी केलेली लावणी यामुळे आजमितीला शेतकऱ्यांची जवळपास ७५ लावणी पूर्ण झाली आहे.
७५ शेतकरी गटांची निर्मिती
पाणी फाउंडेशन गट शेती उपक्रमामध्ये तालुक्यातील ७५ शेतकरी गट सहभागी झाले असून आठवड्याच्या दर बुधवारी डिजिटल शेतीशाळा माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
१ जुलै पासून भात पिकातील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे माध्यमातून मोबाईल ॲपच्या मदतीने भात शेतीचे सर्वेक्षण सुरू केले असून त्या माध्यमातून कीड व रोगांची माहिती घेतली जाणार आहे व वेळीच कीड रोग समजल्यामुळे उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सोपे होणार आहे.
पेण तालुक्यातील आत्तापर्यंत ७५ टक्के भात लावणी पूर्ण झाली असून अजूनही उर्वरित शेतकरी रोपांची व्यवस्था करून आपली लावणी पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन हवे असल्यास कृषी विभाग त्यांना मार्गदर्शन करून त्याचे पीक सुस्थितीत आणण्यास प्रयत्नशील आहेत.
- सागर वाडकर, कृषी अधिकारी - पेण