

उरण : प्रस्तावित भूमिगत बोगद्याच्या कामासाठी पाम बीच रोडवरील 440 पूर्ण वाढलेली झाडे तोडण्याच्या किंवा त्यांच्या पुनर्लागवडीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या येोजनेविरोधात आता जनआक्रोश निर्माण झाला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि झाडे वाचवण्यासाठी रविवार, 1 मार्च 2026 रोजी सानपाडा येथे एका भव्य आणि शांत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.
“आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण नियोजन जबाबदारीने व्हायला हवे. ही झाडे दशकांपूर्वीची असून ती एक नैसर्गिक संरक्षक भिंत आहेत. परिपक्व झाडांच्या पुनर्लागवडीचा यशाचा दर 40 टक्क्यांपेक्षा कमी असतो, त्यामुळे हा पर्याय म्हणजे झाडांचा बळी देण्यासारखाच आहे,असे पाम बीच ग्रीन्स फोरमचे संयोजक श्रीकांत पाटकी म्हणाले, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी शहरातील वृक्षसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सानपाडा परिसरात हवेच्या गुणवत्तेचा स्तर धोकादायक पातळीवर पोहोचला होता. याकडे लक्ष वेधत सतीश निकम म्हणाले की, वाढते श्वसनाचे विकार पाहता नवी मुंबईला आजारी शहर बनण्यापासून वाचवणे गरजेचे आहे. एखादे झाड पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन देण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतात, त्यामुळे सध्याची हिरवळ गमावणे आपल्याला परवडणारे नाही.
रहिवाशांनी एनएमएमसीकडे आपल्या लेखी हरकती आधीच नोंदवल्या आहेत. आता या मानवी साखळीद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेऊन उड्डाणपूल किंवा एलिव्हेटेड रोडसारख्या पर्यायी मार्गांचा विचार करण्याची विनंती केली जाणार आहे.
रविवारी सकाळी 8.30 वाजता केसर सॉलिटेअर इमारतीसमोर, सेक्टर 19, सानपाडा (पाम बीच रोड) येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये पाम बीच ग्रीन्स फोरम नैटकनेक्ट फाउंडेशन आणि सानपाडा ज्येष्ठ नागरिक गट सहभागी होणार आहेत. महानगरपालिकेच्या नोटिशीनुसार, या प्रकल्पासाठी 111 झाडे तोडणे आणि 329 झाडांचे पुनर्रोपण करणे प्रस्तावित आहे. मात्र, रहिवाशांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.