

अलिबाग ः रायगडसह कोकणास मोठा समुद्रकिनारा लाभलाआहे.या किनाऱ्यावर हजारो कुटुंबे वास्तव्य करुन आहेत.मत्स्य उत्पादनातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.याचा फायदा येथील जनतेला होत आहे.या सर्वांचा विकास करण्यासाठी त्यांना मुलभूत गरजा पुरविण्यासाठी रायगडच्या बंदरे विकासाला चालना देण्याचा निर्धार राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी केला आहे.
ना.राणे यांच्या हस्ते बुधवारी आक्षी येथील विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.यावेळीते बोलत होते.या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जि.प. सभापती वैकुंठ पाटील, ॲड.आस्वाद पाटील, डॉ. चित्राताई पाटील,ॲड.महेश मोहिते,नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर आदि उपस्थित होते.
आक्षी येथील खाडीमुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांना बोटी बंदरात आणण्यासाठी भरतीची वाट पाहावी लागते. यामुळे वेळ व आर्थिक नुकसान होत असते. या पार्श्वभूमीवर आक्षी साखर, ता अलिबाग येथील ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहोच रस्ता बांधणे व अस्तित्वातील नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ना. राणे यांनी केले.
आक्षी साखर हे गाव आक्षी खाडी किनारी वसले असून येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी व पर्यटन आहे. अलिबाग परिसरात सुमारे 1 हजार 108 मच्छिमार असून वार्षिक 8 हजार 748 टन मत्स्यउत्पादन होते, तर आक्षी साखर येथे 863 मच्छिमारांकडून सुमारे 2 हजार 297 टन उत्पादन घेतले जाते. एकदरा खाडीतही मोठ्या सुमारे 11.045 टन वार्षिक मत्स्यउत्पादनाची नोंद होते.
या प्रकल्पास 19 सप्टेंबर 2024 रोजी 159 कोटी92 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून 30 ऑक्टोबर 2025 रोजी 151कोटी 78लाख रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पर्यावरणी विभागाची मंजुरीही प्राप्त झाली आहे.
या कामामुळे खाडीतील गाळ साचण्याची प्रक्रिया आटोक्यात येऊन नौकानयन मार्ग मोकळा होईल. मच्छिमारांना कोणत्याही भरतीवेळी बोटींची सहज ये-जा करता येईल व सुरक्षित बंदर उपलब्ध होईल. तसेच किनारपट्टी संवर्धनामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगारातही वाढ होण्याची अपेक्षा ना.राणे यांनी अखेरीस व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाला मेरीटाईम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन, सदस्य तसेच आक्षी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
लाटरोधक भिंतीची उभारणी
या प्रकल्पांतर्गत पूर्वेकडे 1125 मीटर व पश्चिमेकडे 1110 मीटर अशा एकूण 2235 मीटर लांबीची लाटरोधक भिंत उभारण्यात येणार आहे. यासोबत नौवहन मार्गातील गाळ काढणे, 80 मीटर 10 मीटर आकाराच्या दोन जेट्टींचे बांधकाम, जेट्टीमागील भराव आणि 400 मीटर लांबीचा जोडरस्ता उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या कामासाठी 127.61 कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून दि. 16 मार्च 2026 रोजी यांना हे काम देण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 24 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.