

महाड ः मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंचायत समिती महाड प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या टंचाई आराखड्यानुसार महाड तालुक्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सात टँकरद्वारे 12 गावे व त्या अंतर्गत व परिसरातील 56 वाड्यांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पंचायत समितीने दिली आहे.
पिंपळकोंड ,नातोंडी, शेवते ,मुमुशीं ,पाचाड, पदाचा कोंड ,भोगाव ,आढी, पारमाची ,माझेरी, रामदास पठार ,टोळ गावठाण, या गावाच्या हद्दीतील वाड्यांचा तसेच परिसरातील गावांच्या वाड्यांचा टंचाईग्रस्त यादीमध्ये समावेश आहे.
मागील वर्षापेक्षा चालू वर्षी टंचाईग्रस्त गावे वाड्यांची संख्या वाढली असून मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना भेडसावू लागल्या होत्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पाणीटंचाई गंभीर रूप धारण केल्याने दुसऱ्या आठवड्यात या संदर्भातील प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली. महाड तालुक्यातील ग्रामीण भागाप्रमाणे महाड शहरातही मागील आठवड्यापासून आता एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
पावसाळ्याचा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात नियमित सुरू होण्याचे अंदाज व्यक्त होत असतानाच आगामी 40 दिवसांमध्ये ही पाणीटंचाई अधिक गंभीर रूप धारण करेल अशी शक्यता वर्तवली जात असून यामुळे प्रशासनावर त्याचा अतिरिक्त ताण पडणार आहे.
दहा वर्षांपासून वाड्या तहानलेल्या
महाड तालुक्यातील सुरू असलेल्या जलजीवन व संबंधित जीवन प्राधिकरणाच्या योजनांना तातडीने आवश्यक असलेली आर्थिक विधीची तरतूद झाल्यास मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होऊ शकतात असा विश्वास या क्षेत्रातील मंडळींकडून व्यक्त होत आहे .गेल्या दहा वर्षापासून ग्रामीण भागातील शंभर पेक्षा जास्त वाड्या या तहानलेल्या असताना प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करीत आहे असा संतप्त सवाल या टंचाईग्रस्त गावातील जनतेकडून शासनाला विचारला जात आहे.