

पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील 3 गाव 2 वाड्यानी टँकर साठी मागणी केली आहे. त्या गावे वाड्यांना 1 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र गावातील पाणीटंचाई लक्षात घेता सेवाभावी संस्थासह काही राजकीय पक्ष कडून सुद्धा गावागावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त बनले आहे. तालुक्यातील करोडो रुपये खर्ची गेले तरी, देवळेसह इतर बंधारे धरण अपूर्ण अवस्थेत असल्याने व उन्हाळच्या हंगामात नद्या नाळे विहिरी तळ गाठत आहेत. धरण उशाला कोरडा घशाला अशी म्हणायची वेळ आली आहे.
पोलादपूरतालुक्यामध्ये तीन गावे व दोन वाड्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत त्यांना एक टँकरने पाणीपुरवठा सुरळीत आहे. त्यामध्ये कातळी बंगला, मोरगिरी धनगरवाडी, तुटवली गळतीची वाडी, चिरेखिड,कुंभळवणे या भागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे.पोलादपूर हा तालुका दुर्गम व ग्रामीण भागांनी व्यापलेला आहे.
दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्ची करण्यात येत आहे. मात्र दरवर्षी गावातील वाडी वस्तीवर उन्हाळाच्या दिवसात टँकर लागतोच तालुक्यातील 85 गाव 159 वाड्या साठी 244 योजनांचा आराखडामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या पोटी 171 लाख यामध्ये टँकरने 44 गावे 81 वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी 37.50 लाख अंदाजित खर्च होणार आहे.
असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग मार्फत देण्यात आली आहे.पोलादपूरतालुक्यातील प्रलंबित धरणाची कामे मार्गी लागल्यास किंवा कामना गती मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे, मात्र या साठी सक्षम लोकप्रतिनिधी व अधिकारी असणे गरजेचे बनले आहे.
तालुक्यातील गावागावात सरासरी पेक्षा जास्त पाऊस गेल्या काही वर्षे पासून पडत आहे मात्र पाणी अडविण्यासाठी उपयुक्त अशी धरण नसल्याने सदरचे पाणी नदी मार्गे थेट समुद्राला मिळत असल्याने उन्हाळच्या काळात तालुक्यातील नद्या कोरड्या तर विहिरी तळागाळा गेल्याचे विदारक चित्र गेली अनेक वर्षे पाहवयास मिळत आहे. मात्र याकडे होणारे दुर्लक्ष हे ग्रामीण विकासाला मारक असल्याने व शेती व्यवसायाला उध्वस्त करणारे ठरत आहे.
नियोजित योजनांना निधीची गरज
दरवर्षी टंचाई आराखडा तयार करण्यात येत आहे लाखो रुपये या टंचाई आराखड्यावर खर्च होत आहे. मात्र ठोस उपाययोजना होत नसल्याने टंचाईग्रस्त गावाची नावे वाढत आहे. तालुक्यातील पैठण गोळेगणी परसुले येथील लघु पाटबंधारे योजना,धारवली काळवली योजनांसह कोतवाल येथील नियोजित योजनांना निधीची तरतुद केल्यास तालुक्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे. सद्य स्थितीत पोलादपूरात पाणीटंचाईच्या झळा अद्याप जाणवत नसल्या तरी 2026च्या एप्रिल दरम्यान 1 टँकरद्वारे 5 गावे वाडी यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.