

जयंत धुळप, रायगड
राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे मतदान 7 फेब्रुवारीला यथासांग पार पडले. नगरपालिका, महानगरपालिका व्हाया जिल्हा परिषद असा बिनविरोधचा पॅटर्न एका बाजूला गाजत असताना दुसऱ्या बाजूला बहुतांश मंत्र्यांनी स्वबळाचीही चाचपणी केली. सिंधुदुर्गात नितेश राणे, रत्नागिरीत उदय सामंत, रायगडमध्ये सुनील तटकरे, भरत गोगावले अशा मंत्र्यांचीही वर्चस्वाची लढाई आता मतयंत्रात बंद झाली आहे. त्याचा निकाल 9 फेब्रुवारीला लागेल. हा निकालच सर्वकाही सांगणार आहे.
कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. या तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये निश्चित अशी महायुती आणि महाआघाडी होऊ शकलेली नाही. परिणामी सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाचे नारे दिले आहेत. यामुळे कोण आपला गड राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी बांधला चंग
रत्नागिरी जिल्हा परिषदेत राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांनी आपली सत्ता आणण्यासाठी चंग बांधला आहे. शिंदे सेनेने रत्नागिरी जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी स्वबळाचा नारा देत तशी व्यूहरचना आखूनच निवडणूक लढवली आहे. कोकणातील तीसरी आणि सातत्याने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी स्वबळावर बाजी मारणार असल्याचा दावा केला आहे.