

रायगड : कोकणात चुरशीचे सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये रायगड सर्वाधिक ७५ टक्के झाले असून सिंधुदुर्गात ७० तर रत्नागिरीत ६५ टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर झालेल्या एक्झीट पोलमध्ये सिंधुदुर्ग भाजप, रत्नागिरी शिवसेना तर रायगड भाजप राष्ट्रवादी युतीकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेना-भाजप युती होती. तर रायगडमध्ये सत्तेतील तिन्ही पक्ष आमने सामने होते. भाजप राष्ट्रवादीत काही तालुक्यात युती झाली होती. रायगडमध्ये ५९ जागा, रत्नागिरी ५६ तर सिंधुदुर्गात ५० जिल्हा परिषदेच्या जागा होत्या. तर पंचायत समितीत रायगडमध्ये ११८, सिंधुदुर्गात १०० तर रत्नागिरीत ११२ जागा होत्या. या निवडणुकीत सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे, रत्नागिरीत मंत्री उदय सामंत तर रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे मंत्री भरत गोगावले यांच्यातच खरा सामना होता.
रायगड जिल्ह्यामध्ये एकूण १५ पंचायत समित्या आणि रायगड जिल्हा परिषद अशी निवडणूक होती. त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळाली. या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी भाजप राष्ट्रवादी सत्तेपर्यंत पोहो-चेल असे सांगितले जात आहे. सिंधुदुर्गात भाजपचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा एक्झीट पोल आहे. शिवसेनेला १२ ते १३ जागा, ठाकरे शिवसेनेला ८ तर अन्य पक्षाला ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
रत्नागिरीमध्ये शिवसेना ३० जागा घेऊन बहुमताकडे जाईल असे सांगितले जात आहे. या तिन्ही जिल्ह्यात चुरशीचे मतदान झाले आहे. रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हयातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणूकीसाठी आज मतदारांनी मोठा उत्साह दाखवून उत्स्फूर्तपणे मतदान केले.जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिलेल्या अधिकृत माहीती नुसार दुपारी 3.30 वाजे पर्यंत जिल्ह्यात 57.77 टक्के मतदान झाले.
दुपारी मुंबई पुण्यातील रायगडवासीय मतदार जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर दाखल झाले. परिणामी मतदानाचा वेग दुपार नंतर वाढला. संध्याकाळी सात वाजे पर्यंत मतदारांनी रांगा लावून मतदान केले. सात वाजता जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील मतदान पूर्ण झाल्याची माहिती. रायगड जिल्हा निवडणूक यंत्रणेतील उप जिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके यांनी दिली. दुपारी वाढलेला मतदानाचा वेग आणि संध्याकाळी सात वाजे पर्यंत मतदारांनी रांगा लावून केलेले मतदान याचा विचार करता रायगड मधील एकूण मतदान टक्केवारी 75 ते 80 टक्के पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
आधी लगीन लोकशाहीचे
आज मतदानाचा दिवस असला तरी लग्नाचाही मुहूर्त होता. त्यामुळे जिल्हयात ठिकठिकाणी लग्नसमारंभ सुरू होते. परंतु बहुतांश नवरदेव आणि नववधूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्यानंतरच त्यांनी बोहल्यावर चढणे पसंत केले. अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी गावात सचिन धुमाळ या तरूणाचे लग्न संध्याकाळी पनवेल इथं होणार होते. त्याच्या लग्नाची वरात सकाळी थेट मतदान केंद्राबाहेर पोहोचली. नवरदेवाबरोबरच वऱ्हाडी मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि वऱ्हाड पनवेलकडे रवाना झाले. जिल्ह्यात ठिकठिकाणी असेच चित्र पहायला मिळाले.
जिल्ह्यात 19 केंद्रात मतदान यंत्रात किरकोळ बिघाड
जिल्हयात ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार समोर आले. सहाण(अलिबाग) येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मतदान यंत्रात केंद्रात बिघाड झाला.त्यामुळे मतदारांचा काही काळ खोळंबा झाला. यंत्रदुरूस्ती होवून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सांदोशी (महाड) येथेही काही काळ मतदान यंत्र बंद पडले होते. जिल्हयात सुधागडमध्ये दोन तर अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि महाड तालुक्यात प्रत्येकी एका ठिकाणी असे सात ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला. तर सुधागडमध्ये तीन, मुरूड व महाडमध्ये प्रत्येकी दोन तर अलिबाग, श्रीवर्धन आणि पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी एक ठिकाणी मिळून दहा ठिकाणी मतदान सुरू झाल्यानंतर मतदान यंत्र बदलण्याची वेळ आली.
मान्यवरांनी देखील बजावला मतदानाचा हक्क
जिल्हयातील लोकप्रतिधींनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनी दुरटोली मतदानाचा हक्क बजावला .रोजगार मंत्री भरत गोगावले यांनी खरवली येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी थळ येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बाजावला.
५०२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
मतदान यंत्रातील बिघाड होण्याचे किरकोळ प्रकार वगळता रायगडमध्ये मतदान शांततेत झाले. जिल्हा परीषदेच्या ५९ जागांसाठी १७३ तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ३२९ अशा एकूण ५०२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्या वेळेत मतदारांचा प्रतिसाद कमी होता. नंतर हळूहळू मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. पहिल्या दोन तासात ११.५ टक्के तर साडेअकरा वाजेपर्यंत २७.५२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते. आपल्या हक्काच्या मतदारांनी लवकरात लवकर मतदान करून घ्यावे यासाठी धावपळ सुरू होती. दुपारी तीन वाजल्यानंतर पुन्हा एकदा मतदानाचा वेग वाढल्याचे पहायला मिळाले. रायगडच्या बाहेर असलेले मतदार दुपारनंतर मोठ्या प्रमाणात आले. संध्याकाळी सात वाजे पर्यंत मतदारांनी मतदान केले.