

पनवेल शहर ः बुद्ध पौर्णिमा निमित्त कर्नाळा बर्ड सँक्च्युरी येथे वन विभागाच्या वतीने प्राणी गणना मोहिम उत्साहात पार पडली. मुंबईगोवा महामार्गालगत असलेल्या या अभयारण्यात पहाटेपासूनच विविध ठिकाणी मचान उभारून आणि ट्रॅप कॅमेऱ्यांच्या साहाय्याने प्राण्यांची नोंद करण्यात आली.
या गणनेत वन अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक सर्पमित्रांचा सक्रिय सहभाग होता. जंगलातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. माकडे, ससे, हरिण यांसह विविध पक्ष्यांची संख्या नोंदविण्यात आली असून काही दुर्मिळ प्रजातींचेही दर्शन घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी जंगल संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलन याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांनी जंगल परिसरात प्लास्टिक टाकू नये, प्राण्यांना त्रास देऊ नये असे आवाहन करण्यात आले.
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला होणारी ही प्राणी गणना वन्यजीवांच्या हालचाली, संख्या आणि अधिवास यांचा अभ्यास करण्यास उपयुक्त ठरते. यामुळे भविष्यातील संरक्षणात्मक उपाययोजना आखण्यास मदत होत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.