

आनंद सकपाळ
नेरळ: कर्जत तालुक्यातील डिक्सळ गावाजवळील दारबड पठार परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेले मुंबईतील सायन येथील तीन तरुण ट्रेकर्स मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे डोंगराळ भागात अडकले.
सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री उशिरा नेरळ पोलिस, खोपोली हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक तरुणांच्या संयुक्त प्रयत्नांतून या तिन्ही ट्रेकर्सची सुखरूप सुटका करण्यात आली.
मुंबईतील सायन परिसरातील दीपक भागाय, राघव आणि बोरोस बिक्सल हे सुमारे २५ वर्षे वयोगटातील तिघे तरुण सकाळी ट्रेकिंगसाठी दारबड पठारावर गेले होते. गड चढताना वेळ झाल्याने परतीच्या प्रवासाला उशीर झाला. त्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला, दाट धुके पसरले आणि अंधार पडल्याने मार्गाचा अंदाज न आल्यामुळे ते डिक्सल गावाच्यावरील डोंगराळ भागात अडकले.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच या ट्रेकर्सनी नेरळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राहुल वरोटे यांनी तातडीने खोपोली हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर सागाचीवाडी येथील संदीप मिर्गुडे आणि सुरेश पाटील यांनी प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता डोंगर चढून अडकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली.
दाट धुके, मुसळधार पाऊस आणि रात्रीचा अंधार अशा आव्हानात्मक परिस्थितीत बचाव पथकाने तिन्ही ट्रेकर्सना शोधून काढले. त्यांना सुरक्षित मार्गाने खाली आणत डिक्सळ गावाच्या परिसरात सुखरूप पोहोचविण्यात आले.
याबाबत ट्रेकर्सनी सांगितले की, आम्ही सकाळी सायन आणि नवी मुंबई परिसरातून आलो होतो. ट्रेकिंगला उशीर झाल्याने वर पोहोचेपर्यंत अंधार पडला. पाऊस सुरू झाल्यामुळे आणि रस्ता माहिती नसल्याने आम्ही अडकलो.
पोलिस ठाण्यात फोन केल्यानंतर पोलिसांनी तातडीने मदत केली आणि बचाव पथकातील दोघांनी वर येऊन आम्हाला सुखरूप खाली आणले.गणेशोत्सवाच्या उत्साहात पर्यटकांची गर्दी वाढत असताना या धाडसी बचाव मोहिमेमुळे तीन तरुणांचे प्राण वाचले. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुल वरोटे यांनी पावसाळ्यात उशिरा ट्रेकिंग करू नये, तसेच स्थानिक मार्गदर्शनाशिवाय डोंगराळ आणि अपरिचित भागात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.