

कोप्रोली उरण ः कळंबुसरे गावात मागील वर्षी 26 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजताचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कळंबूसरे गावासह चिरनेर, सारडे व वशेणी गावातील काही घरांचे असे तालुक्यातील 80 ते 85 नागरिकांच्या घरांच्या छपरांचे व जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते.
त्यावेळी कोप्रोली मंडळ अधिकारी के.डी.मोहिते आणि तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन, गावातील नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करून, त्याचा अहवाल उरणचे तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केला होता. परंतु या घटनेला आठ महिने उलटून देखील अद्याप तालुक्यातील नागरिकांना तातडीची कोणतीही शासनाची मदत मिळालेली नाही.
कळंबुसरे या गावात सुमारे 80 ते 85 घरांच्या छापरांचे व घरातील जीवनावश्यक वस्तूंचे अचानक आलेल्या वादळी पावसात अतोनात नुकसान झाले होते.यामध्ये गतवर्षी सोमवारी 26 मे 2025 रोजी सकाळी अचानक आलेला पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथील नागरिकांच्या घरांचे छप्परच उडाले होते. तर काही घरांच्या भिंतींची पडझड झाली होती. तर काही घरांमध्ये पाणी घुसले होते.
दरम्यान घराच्या संपूर्ण छपरा बरोबर घरातील विद्युत उपकरणे तसेच कपडे, बेड, सोपा अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसाने तालुक्यातील गावांना अक्षरश: झोडपून काढले होते. मात्र वादळी पावसातील घरांच्या घटनेला आठ महिने उलटून गेले तरी अजून शासनाची नुकसान भरपाई मिळालेली नाही.
लगेचच पावसाळा सुरु होणार असल्याने स्वतःच्या कुटुंबाचे रक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या नागरिकांनी कर्ज काढून आणि अन्य स्वयंसेवी संस्थासह विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून तीन - चार दिवसात आपापल्या घरांची वादळी पावसाच्या झटक्यात उडालेली छपरे कशीबशी बसवून घेतली. मात्र शासनाकडून करण्यात आलेले नुकसान भरपाईचे पंचनामे आठ महिने होऊनही लालफितीच्या बसनात गुंडाळून ठेवले असल्याच्या प्रतिक्रिया नुकसान ग्रास्थानमधून व्यक्त होत आहेत. त्यातच आत्ता पुन्हा तीन महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असतांना देखील या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी धजावत नसल्याने वादळी पावसातील नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
उरणचे तहसिलदार यांनी नुकसान ग्रसतांना कोणत्याही प्रकारे तातडीची मदत न देता नुकसानग्रस्त घरांचे फक्त पंचनाम्यांचे आदेश होते. आत्ता तर नुकसानग्रस्तांच्या जखमेवर मिठ चोळल्यागत तहसील कार्यालयात नुकसानीच्या चौकशीसाठी गेल्यावर आश्वासनापेक्षा आजतगायत काहीही मिळालेलं नाही. त्यामुळे या नुकसान ग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
मनोज पाटील, नुकसानग्रस्त - कळंबूसरे