

जेएनपीए : उरण मध्ये सतत जोरदार पाऊस सुरु असून मुसळधार पावसानंतर शनिवारी मध्यरात्री उरण तालुक्यात वादळी वाऱ्याने जोरदार धुमाकूळ घातला. सतत सुरु असलेल्या वादळी वाऱ्याचा फटका जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरणातील एनएसएफटी टर्मिनलला बसला असून, येथे रचून ठेवलेले रिकामे कंटेनर अचानक कोसळून एका १९ वर्षीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना सोमवारी दिनांक ६ जुलै रोजी सकाळी झाल्याचे काही प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे.
अमितकुमार किशोर प्रसाद (वय १९, रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान, या गंभीर दुर्घटनेबाबत अधिकृत यंत्रणांनी मौन बाळगल्याने माहिती दडवली जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.सदर माहिती बाबत जेएनपीए प्रशासन तसेच पोलीस प्रशासनातर्फे कोणतेही त्वरित अधिकृत माहिती मिळाली नसल्याने या अपघाताचे गूढ अधिकच वाढत आहे.
पोलीस प्रशासनाकडे फोन द्वारे चौकशी केली असता एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे व अधिक तपास सुरु असल्याचे एवढेच सांगण्यात आले.मात्र एवढी मोठी दुर्घटना घडली तरी वेळेत आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी कर्मचारी वर्ग तिथे पोहोचायला पाहिजे. तसे या घटनेत दिसून येत नाही. तात्काळ मदत न मिळाल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
वेसेल वर कंटेनर समुद्रातील जहाजात भरताना हा अपघात घडले असल्याचे बोलले जात आहे.मयत कर्मचारी अमितकुमार किशोर प्रसाद याचा मृतदेह उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालायात नेण्यात आला असून, तेथे मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याबाबत न्हावा - शेवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.दरम्यान या घटनेतून जेएनपीए प्रशासनाच्या अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.