

रायगड : हिरे आणि दागिने निर्यातीला येत्या काळात मोठी गती प्राप्त होणार आहे. भारतीय टपाल विभाग, महाराष्ट्र मंडळ आणि भारत डायमंड बोर्स (बीडीबी) यांच्यात मौल्यवान मालवाहतुकीसाठी नुकताच सेवा सहकार्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारामुळे आता हिरे व दागिने व्यापाऱ्यांना त्यांच्या मौल्यवान मालाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरक्षित आणि अधिक किफायतशीर पद्धतीने करता येणार आहे.
भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र मंडळाचे वरिष्ठ अधीक्षक पांडुरंग चोरमले आणि भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता यांनी महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली. जेम्स ॲन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या (जीजेईपीसी) अहवालानुसार नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या आकडेवारीनुसार हिरे आणि दागिने क्षेत्रातील निर्यातीची स्थिती युद्ध परिस्थितीतही स्थिर असल्याचे दिसून येत आहे. भारताची एकूण हिरे आणि दागिने निर्यात 27.72 अब्ज डॉलर्स (2,44,827 कोटी रुपये) इतकी नोंदवण्यात आली आहे.
महत्त्वाचे निर्यात कल
सोन्याचे भाव जरी चढे असले, तरी दागिन्यांची निर्यात स्थिर राहिली आहे. विशेषतः खडे जडवलेल्या दागिन्यांच्या मागणीत 6.27 टक्के वाढ झाली आहे. चांदीच्या दागिन्यांच्या निर्यातीत 52 टक्के आणि प्लॅटिनम दागिन्यांत 39 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. हे या क्षेत्रातील नवीन संधी दर्शवणारे ठरले आहे. युएसए , युएई , हाँगकाँग, बेल्जियम आणि इस्रायल हे भारतीय हिरे आणि दागिन्यांचे मुख्य ग्राहक देश आहेत.
निर्यात स्थिती टिकवण्यात यश
जागतिक राजकीय अस्थिरता आणि अमेरिकेतील टॅरिफ धोरणांमधील बदलांमुळे एकूण निर्यातीत थोडी घट झाली असली, तरी भारतीय उद्योगाने युएई, ऑस्ट्रेलिया या नवीन बाजारपेठा शोधून आपली निर्यात स्थिती टिकवून धरली आहे. भारत डायमंड बोर्स आणि टपाल विभाग यांच्यातील नवीन करारामुळे ही निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ आणि स्वस्त होऊन भविष्यात ही आकडेवारी वाढण्यास मदत होणार आहे.
कराराची प्रमुख वैशिष्ट्ये
व्यापक वाहतूक सुविधा : ‘बीडीबी’चे सदस्य आणि बिगर-सदस्यांना आयात-निर्यात तसेच देशांतर्गत पार्सल्ससाठी टपाल विभागाच्या सेवांचा थेट लाभ घेता येईल.
फॉरेन पोस्ट ऑफिसची स्थापना : मुंबईतील बीकेसी येथील भारत डायमंड बोर्समधील युनिट क्रमांक 1 आणि 2 मध्ये भारतीय टपाल खात्याचे फॉरेन पोस्ट ऑफिस सुरू केले जाणार आहे. यामुळे निर्यातदारांना त्यांच्या आवारातच कस्टम क्लिअरन्स आणि बुकिंगची सुविधा मिळेल.
अद्ययावत सेवांचा समावेश : स्पीड पोस्ट, इंडिया पोस्ट पार्सल, टपाल वाहतूक आणि ‘मिडिया पोस्ट’ यांसारख्या सेवा याद्वारे उपलब्ध करून दिल्या जातील.
सुरक्षितता आणि सुलभता : उच्च मूल्य असलेल्या आंतरराष्ट्रीय मालासाठी टपाल विभाग प्रमुख वाहतूक भागीदार म्हणून काम करेल, ज्यामुळे निर्यातदारांचा खर्च कमी होऊन प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
निर्यातीला मिळणार बळ : या सहकार्य करारामुळे भारत डायमंड बोर्समधून होणाऱ्या मालाची वाहतूक अधिक जलद होणार आहे. विशेषतः छोट्या आणि मध्यम निर्यातदारांसाठी हा एक किफायतशीर पर्याय ठरणार असून, यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय हिरे उद्योगाची पकड अधिक घट्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.