

ठळक मुद्दे
मुंबई-गोवा महामार्गाचे 13 वर्षापासून विस्तारीकरण
खड्डे आणि महामार्गाची दशा दाखवण्यासाठी पेण तालुक्यातील तरुणाचा पायी प्रवास
महामार्गाच्या बाजूला असणारे सर्विस रोड खड्ड्याने भरलेले
Chaitanya Laxman Patil of Patni village in Pen taluka travels on foot to fix potholes on the highway
पेण (रायगड) : कमलेश ठाकूर
मुंबई-गोवा महामार्गाचे गेले 13 वर्ष सुरू असणारे विस्तारीकरण आतापर्यंत किती झाले आहे, या महामार्गावर अजूनपर्यंत किती खड्डे आहेत, किती ओव्हरब्रिज होणे बाकी आहे, अजूनपर्यंत अजून किती सर्विस रोड होणे बाकी आहे, अशा प्रकारची एकूणच महामार्गाची दशा पाहण्यासाठी पेण तालुक्यातील पाटणी गावाचा चैतन्य लक्ष्मण पाटील हा युवक पळस्पे -पनवेल येथून झाराप सिंधुदुर्ग अशी महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेपर्यंत पायी चालत रक्षाबंधनाच्या दिवसापासून निघाला आहे.
या त्याच्या प्रवासात एकूण खड्डे आणि महामार्गाची दशा पाहता तो झारापपर्यंत कधी पोहोचेल हे तोही सांगू शकत नाही. अशा प्रकारची व्यथा ‘दैनिक पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना त्याने व्यक्त केली.
पळस्पे येथून रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी दहा वाजता निघालेला चैतन्य पाटील त्या दिवशी संध्याकाळी केवळ 20 किमी पर्यंत चालत आला आणि कर्नाळा या भागात येईपर्यंत त्याला सायंकाळ झाली, अशा स्थितीत त्याने तेथेच युसूफ मेहेर आलीच्या सामाजिक संस्थेत आसरा घेऊन रात्र काढली व पुन्हा सकाळी तो पेण तालुक्यातून नागोठण्याच्या दिशेने निघाला आहे
या त्याच्या प्रवासात त्याच्या जवळचे आणखी दोन सहकारी टॅक्सी घेऊन हे साथ देत आहेत. मात्र तो एकटाच पूर्णपणे पायी चालत आहे. आजतागायत मात्र एकूणच महामार्गाचे काम 60 टक्केपर्यंत पूर्ण झालेले दिसत आहे. अजूनही महामार्गाच्या बाजूला असणारे सर्विस रोड हे खड्ड्याने भरलेले आहेत, तर महामार्गावर अजूनही पथदिवे नाहीत तर दोन रस्त्याच्यामध्ये असणारी झाडे सुद्धा दिसत नसल्याचे खंत त्याने व्यक्त केली.
महामार्गावरील प्रत्येक खड्ड्याचे तो फोटो घेऊन त्याचे लोकेशन गुगल द्वारे अपडेट घेऊन तो संबंधित महामार्गाच्या अभियंत्यांना पाठवत आहे, जेणेकरून तोच खड्डा तेच लोकेशन असेल यावरून तो खड्डा किमान भरला जावा ही त्याची अपेक्षा. मार्गावरील एवढे खड्डे आणि काही ठिकाणी तर पूर्ण रस्ता हा उखडला गेलेला दिसत असल्याने या ठिकाणचे फोटो व्हिडिओ शूटिंग पाठवण्यासाठी त्याला वेळ लागत आहे. यामुळे पुढील पाचशे किलोमीटरच्या प्रवास करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील हे चैतन्य पाटील सुद्धा सांगू शकत नाही. मात्र तरीही सगळ्या खड्ड्यांचे फोटो अपडेट पाठवण्याचं मानस त्याचा आहे आणि तोपर्यंत त्याचा पायी चालण्याचा प्रवास तो थांबवणार नाही.
या दोन दिवसांच्या प्रवासात अजूनपर्यंत एकाही अभियांत्याने हे पायी प्रवास थांबववण्याची तसदी घेतली नाही. - चैतन्य पाटील
चैतन्य लक्ष्मण पाटील, पाटणी गाव, पेण तालुका, रायगड
प्रवासात त्याला मिळतोय मानसिक आधार आणि अपेक्षा या प्रवासादरम्यान विविध गावचे कार्यकर्ते, सरपंच, सामाजिक संघटना त्याला त्याच्या कामासाठी शुभेच्छा देत आहेत. आणि किमान खड्डे तरी भरले जावेत यासाठी त्याच्याकडे अपेक्षा व्यक्त करीत आहेत. एकूणच गणेशोत्सवापूर्वी तरी किमान खड्डे भरले जावेत आणि कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखमय व्हावा एवढी माफक अपेक्षा त्याच्यापुढे व्यक्त करत आहेत.