

उरण: उरणकरांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या गव्हाण फाटा - चिरनेर मार्गावरील रेल्वे ओव्हरहेड पुलाचे अखेर थाटात उद्घाटन झाले. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचा मार्ग मोकळा झाल्याने, उरण पूर्व विभागातील हजारो नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शनिवारी मध्य रेल्वेचे अधिकारी श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत, गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजाराम मांढरेकर यांच्या हस्ते फित कापून हा पूल रितसर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पूल सुरू झाल्यामुळे केवळ अंतरच कमी झाले नाही, तर वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. याचा थेट फायदा चिरनेर, दिघोडा, विंधणे, वेश्वी, चिर्ले, कळंबुसरे, आवरे, वशेणी, केळवणे, कोप्रोली आणि खोपटा या गावांना मिळणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी टीआयपीएल अभियंता सतिश उगले, क्षितिज पांडे, आनंद मोर्या, प्रताप साहू, संदीप बोर्डे, आर. जी. ठाकूर, गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे पोलीस नायक रुपेश दराडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. हा पूल उरणच्या विकासाला नवी गती देणारा ठरेल, अशा भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
दैनंदिन पाच हजार प्रवाशांची वर्दळ
दररोज 5,000 पेक्षा जास्त प्रवासी आणि वाहनचालकांची मागील 3 वर्षांपासून होणारी ससेहोलपट थांबणार आहे. रखडलेल्या पुलामुळे या मार्गावर बंद असलेली एसटी बस सेवा आता जोमाने सुरू होईल. पनवेल, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे या शहरांकडे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचा आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
प्रशासनाने एप्रिल अखेरीस हा पूल सुरू करून नागरिकांची मोठी अडचण दूर केली आहे. याबद्दल आम्ही संबंधित विभागाचे आभार मानतो.
- ॲड. सत्यवान भगत (तालुकाध्यक्ष, मनसे)