

उरण : हिवाळी स्थलांतर हंगाम मध्यावर आला असतानाही, नवी मुंबईचे वैभव असलेल्या नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिगो तलावात अद्याप फ्लेमिंगोंचे थवे दाखल झालेले नाहीत. तलावावर साचलेल्या दाट हिरव्या शेवाळाच्या चादरीमुळे हा भाग जलपक्ष्यांसाठी जणू डेथ ट्रॅप ठरण्याची भीती निर्माण झाली असून, पर्यावरणप्रेमींनी प्रशासकीय अनास्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
सध्या तलावाचा बहुतांश भाग सायनोबॅक्टेरियायुक्त शैवाळाने व्यापला आहे. यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून, केवळ अरुंद जलमार्ग शिल्लक राहिले आहेत.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांच्या मते, अनियंत्रित शैवाळ वाढ अन्नाची गुणवत्ता आणि पाण्याची रासायनिक संरचना बदलते. हे विषारी घटक पक्ष्यांसाठी प्राणघातक ठरू शकतात.
मागील वर्षी झालेल्या फ्लेमिंगो मृत्यूनंतर या तलावाला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा झाली. मात्र, त्याचा अधिकृत शासन निर्णय अद्याप प्रलंबित आहे. "केवळ दर्जा देऊन उपयोग नाही, तर प्रत्यक्ष मैदानावर पर्यावरणीय व्यवस्थापन होणे गरजेचे आहे," असे नवी मुंबई पर्यावरण संरक्षण सोसायटीचे संदीप सरीन यांनी स्पष्ट केले.
साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणारे फ्लेमिंगो पक्षी जानेवारी उजाडला तरी मोठ्या संख्येने फिरकलेले नाहीत. तलावात संशयास्पद फेस आणि दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी असूनही कारवाई शून्य आहे. ओलसर भूभाग नष्ट झाल्यास मुख्य ठाणे खाडी अभयारण्यावर ताप्ण वाढून फ्लेमिंगो हा परिसर कायमचा सोडून जाण्याची शक्यता आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशनने महाराष्ट्र मॅन्ग्रोव्ह सेलला दिलेल्या निवेदनात, तलावातील शैवाळ तातडीने हटवून त्याचे पुनर्संचयितीकरण करण्याची मागणी केली आहे. कच्छच्या रणमधील बदललेल्या परिस्थितीमुळे पक्ष्यांचे आगमन आधीच लांबले आहे, अशात जर स्थानिक तलाव प्रदूषित राहिले तर यंदा नवी मुंबईकरांना गुलाबी पाहुण्यांचे दर्शन दुर्मिळ होईल.
"हा आता केवळ सौंदर्याचा प्रश्न राहिलेला नाही, तर हा तलाव पर्यावरणीय ताणाखाली आहे. प्रशासनाने तातडीने पोषकतत्त्व नियंत्रण उपाययोजना केल्या नाहीत, तर हा हंगाम कोरडाच जाईल."
बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन