Raigad News : कोकणातील पाऊस पद्धतीत होतोय बदल, पीक पॅटर्नही बदलणार

कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले, अतिवृष्टीमुळे महापूर, भूस्खलन
irregular rainfall impact
irregular rainfall impactpudhari photo
Published on
Updated on

रायगड : किशोर सूद

कोकणातील हवामान गेल्या काही वर्षांत मोठ्या बदलांना सामोरे जात आहे. पावसाचे वितरण, चक्रीवादळांची वारंवारता वाढत आहे. निसर्ग, तौक्ते चक्री वादळाने कोकणात मोठे नुकसान केले आहे. तापमानातील चढ-उतार यामुळे निसर्गचक्रात लक्षणीय बदल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे महापूर, भूस्खलन यातून मोठी जीवित व वित्त हानी होत आहे. मागील काही वर्षांतील पावसाचा आढावा घेतल्यास हे गंभीर बदल अधिक स्पष्टपणे दिसून येतात.

2023 मध्ये कोकणात पावसाची अनिश्चितता दिसून आली. तेव्हा जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली. मात्र, जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्याने सरासरी भरून निघाली. परतीचा पाऊस लांबला होता. 2024 मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर प्रचंड होता. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. 2025 या वर्षात पावसामध्ये मोठी विषमता दिसून आली.

irregular rainfall impact
Monsoon signs in nature | निसर्ग संकेत भरपूर पावसाचे!

पावसाचे आगमन वेळेवर झाले, पण पावसाच्या दिवसांमध्ये मोठे अंतर होते. कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले. मागील काही वर्षांत पावसाच्या पद्धतीत बदल दिसून येत आहे. पूर्वी पाऊस चार महिने सातत्याने पडायचा. आता तो कमी दिवसांत जास्त प्रमाणात कोसळतो . यामुळे जमिनीची धूप वाढली आहे आणि पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अरबी समुद्राचे तापमान वाढत असल्याने चक्रीवादळांची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे. याचा थेट फटका कोकण किनारपट्टीवरील नारळ, सुपारीच्या बागायतीला बसत आहे.

पावसाळ्यातही काही काळ कडक ऊन पडत असल्याने आर्द्रता वाढते, ज्याचा परिणाम आंबा आणि काजूच्या पिकांवर, विशेषतः मोहोर प्रक्रियेवर होत आहे. परतीच्या पावसाचा कालावधी ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत लांबत चालला आहे. यामुळे भात कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.पावसाच्या वितरणात बदल झाल्याने कृषी आणि जनजीवनावर परिणाम होत आहे. कोकणात प्रामुख्याने भातशेती हे पीक घेतले जाते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे लावणी आणि कापणीच्या नियोजनात अडथळे येत आहेत.

कोकणातील हापूस आंब्याला बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका बसत असून, लहरी पावसामुळे कीड आणि रोगांचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असूनही, डोंगर उतारावरून पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात अनेक तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. हे हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंगचा स्थानिक परिणाम दर्शवतात.

शाश्वत विकासासाठी आता पावसाचे पाणी अडवणे आणि बदलत्या हवामानाला पूरक अशा शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. कोकणातील पावसाच्या आकडेवारीचा विचार करता, गेल्या तीन वर्षांत पावसाचे प्रमाण आणि वितरण यामध्ये मोठी तफावत दिसून येते. कोकण विभागाची वार्षिक सरासरी साधारण 3000 मिमी ते 3500 मिमी दरम्यान असते, परंतु जिल्ह्यानुसार यात बदल होतो. 2024 हे वर्ष कोकणसाठी सर्वाधिक पावसाचे ठरले.

irregular rainfall impact
Monsoon Return Journey : परतीच्या पावसाची ‘झळ’; निफाड तालुक्याला पावसाचा फटका

या वर्षी अनेक जिल्ह्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली होती. विशेषतः जुलै महिन्यात काही ठिकाणी एकाच दिवसात 300 ते 400 मिमी पावसाची नोंद झाली होती. आकडेवारी दर्शवते की, एकूण पावसाचे प्रमाण कायम असले तरी पावसाच्या दिवसांची संख्या कमी होत आहे. याचा अर्थ, कमी दिवसात जास्त पाऊस पडत आहे. एकूण पावसाच्या 40 टक्के ते 50 टक्के पाऊस एकट्या जुलै महिन्यात पडत असल्याचा कल दिसून येत आहे.

अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ

कोकणात गेल्या तीन वर्षात ताशी 100 मिमी पेक्षा जास्त वेग असणाऱ्या पावसाच्या घटनांमध्ये 15 टक्के ते 20 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड देण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे आकडेवारी सरासरी गाठत असली तरी पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पावसाची आकडेवारी अनपेक्षितपणे वाढताना दिसत आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, कोकणात आता पावसाचे प्रमाण कमी होण्यापेक्षा त्याच्या पद्धतीत होणारा बदल हा अधिक गंभीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news