

कापोली : एकेकाळी ज्या पवित्र विसर्जन घाटावर बोर्लीपंचतन आणि कापोली परिसरातील शेकडो गणेशमूर्तींचे अत्यंत भक्तीभावाने विसर्जन केले जायचे, तो ऐतिहासिक आणि पवित्र गणपती विसर्जन घाट आज प्रशासकीय अनास्था आणि काही बेजबाबदार नागरिकांमुळे नरकयातना भोगत आहे. नदीचे पाणी इतके दूषित आणि सडले आहे की, भाविकांना बाप्पाचे विसर्जन तिथे करणे अशक्य झाले आहे. परिणामी, बोर्लीपंचतन व कापोली येथील नागरिकांना नाईलाजास्तव गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी दिवेआगर समुद्रात जावे लागत आहे.
गरीब कुटुंबांना आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास- या समस्येचा सर्वाधिक फटका परिसरातील गरीब कुटुंबांना बसत आहे. आधीच सण-उत्सवाचा खर्च आणि त्यात गावाची नदी दूषित असल्याने, आर्थिक परिस्थिती नसतानाही या गरीब कुटुंबांना काही ना काही तजवीज करून, वाहने भाड्याने करून विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यावर जावे लागते.
जर या विसर्जन घाटाने मोकळा श्वास घेतला, नदी स्वच्छ झाली, तर पुन्हा पूर्वीप्रमाणेच या पुलाशेजारी बाप्पाचे विसर्जन होईल. यामुळे गरीब जनतेचा नाहक होणारा त्रास, वेळ आणि हक्काचा पैसा वाचू शकेल, अशी आर्त हाक आता स्थानिक नागरिकांमधून दिली जात आहे.
बातम्यांना केराची टोपली; लोकप्रतिनिधी सुस्त!- गेल्या काही वर्षांपासून स्थानिक वर्तमानपत्रांमधून या गंभीर समस्येवर सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. बोर्लीपंचतनमधील सजग समाजसेवकांनी वारंवार आवाज उठवला, मात्र सुस्त प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या जनआक्रोशाला नेहमीच केराची टोपली दाखवली.
निवडणूक आली की आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आज या पवित्र घाटाच्या आणि नदीच्या संवर्धनासाठी एक पाऊलही पुढे टाकायला तयार नाहीत, असा संताप स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे.
'आता सहन करणार नाही!'-आंदोलनाचा इशारा
लोकांनी आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावावी आणि आपला हा पवित्र विसर्जन घाट वाचवावा, असे आवाहन समाजसेवकांनी केले आहे. जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने नदी संवर्धनाचे आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले नाही, तर बोर्लीपंचतन आणि परीसरातील जनता येत्या काळात प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा समाजसेवक सुमित सावंत यांच्याकडून देण्यात आला आहे.