किल्ले रायगडवरून ‘हर घर सावरकर’ अभियानाला सुरुवात | पुढारी

किल्ले रायगडवरून 'हर घर सावरकर' अभियानाला सुरुवात

नाते; पुढारी वृत्तसेवा: पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र परिवाराकडून सुरू केलेल्या ‘हर घर सावरकर’ या अभियानाची आज (दि.२१) किल्ले रायगडावरून सुरूवात करण्यात आली. यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.

या अभियानार्तंगत राज्यात वर्षभरात एकूण ७५ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी  महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदीसह शिवभक्त व सावरकरप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

उदय सामंत म्हणाले की, या अभियानाची सुरुवात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून होत आहे, याबद्दल आयोजक समितीचे विशेष कौतुक करत आहे. मी रायगडचा तात्पुरता पालकमंत्री आहे, कारण भरतशेठ गोगावले रायगडचे भावी पालकमंत्री होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

आमदार भरतशेठ गोगावले म्हणाले की, जे कोणी सावरकरांवर संशय घेतात, त्यांनी एकदा अंदमान निकोबार येथे जाऊन सावरकर ज्या कोठडीत शिक्षा भोगत होते. ते पाहून, त्यांचा इतिहास वाचून घ्यावा आणि मगच सावरकरांबद्दल बोलावे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आगामी ३५० शवुक दिनाला तिन्ही दलाकडून शिवरायांना शासकीय मानवंदना देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली.

यावेळी शिवरायांच्या काही गीतांवर महिला नृत्य कलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर केले. “वीर सावरकर” या महानाट्यामधील कलाकार अभिषेक शाळू याने या नाटकातील काही संवादाचे यावेळी सादरीकरण केले. तर श्रीमंत बाजीराव पेशवा निवासी सैनिक शाळेच्या (ता. मोहोळ, जि. सोलापूर) विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांना सैनिकी शैलीत मानवंदना देऊन साहसी प्रात्यक्षिके सादर केली. यास सर्वांनी भरभरून दाद दिली.

हेही वाचा 

Back to top button