तीन महिन्यात रायगडातून ४७ बालिका गायब

तीन महिन्यात रायगडातून ४७ बालिका गायब

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यक्षेत्रातील २८ विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या तीन महिन्यात तब्बल ४७ बालिका बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर ११ बालकेही गायब असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात २८ पोलिस ठाण्यांमध्ये एकुण ५३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देशभरात महिला आणि मुली गायब होण्याचे प्रकार वाढत असून महाराष्ट्रात तीन महिन्यात ५ हजारांहून अधिक मुली हरवल्याचे समोर आले. यात रायगड जिल्हा देखील मागे नाही. रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यक्षेत्रात पनवेल आणि उरण तालुका वगळता १३ तालुक्यांचा समावेश आहे. या १३ तालुक्यांमध्ये २८ पोलिस ठाणे आहेत. अलिबाग, कर्जत आणि नेरळ या तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक जास्त प्रत्येकी पाच मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर रोहा, रसायन मधून चार मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.

खालापूर, पेण आणि पाली पोलिस ठाण्यात प्रत्येकी तीन मुली गायब झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. माणगाव, गोरेगाव, नागोठण्यातून प्रत्येकी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. महाड तालुका, महाड शहर, माथेरान, खोपोली, वडखळ, पोयनाड आणि रेवदंडा या पोलिस ठाण्यातून प्रत्येकी एक मुलगी बेपत्ता आहे. श्रीवर्धन, दीघी सागरी, म्हसळा, कोलाड, मुरुड, तळा, हद्दीतून एकाही मुलीच्या अपहरणाबाबतचा गुन्हा नाही

शोध लावण्याचे मोठे आव्हान

याच तीन महिन्यात ११ बालक गायब झाल्याचे गुन्हे देखील नोंद आहेत. यात कर्जतमध्ये तीन, रसायनीतून दोन तर रोहा, कोलाड, नेरळ, खोपोली, पेण आणि रेवंदडा या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक बालक गायब झाल्याची नोंद आहे. एकुण ५८ अल्पवयीन मुले मुली गायब असल्याने त्यांच्या शोध लावण्याचे मोठे आव्हान रायगड पोलिस दलावर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news