नानगाव : पुढारी वृत्तसेवा: नानगाव (ता. दौंड) येथील हातवळण फाटा ते दापोडी टोलनाकापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता, हेदेखील कळत नाही. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. जवळपास पाच ते सहा किमीच्या अंतरात हे खड्डे आहेत. नानगाव-वडगाव रासाई येथील भीमा नदीवर पूल असल्याने शिरूर, श्रीगोंदा आणि नगर या जिल्ह्यांतून पुण्याकडे जाण्यासाठी बरेचसे वाहनचालक या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते.
नानगाव, हातवळण, मांगोबाळ, दापोडी या भागांतील नागरिक केडगावच्या बाजारपेठेत जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांची देखील या रस्त्यावर वर्दळ असते. दररोज सकाळी नोकरदार, शालेय विद्यार्थी, दुग्धव्यावसायिक, वाहतूकदार दररोज या रस्त्याने ये-जा करीत असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस पडल्यावर याच खड्डयात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले जाऊन खड्ड्यातील खडी बाजूला
निघून सगळ्या रस्त्यावर खडीचे साम्राज्य निर्माण होईल. एकीकडे रस्त्यावरील खड्डे आणि दुसरीकडे रस्त्यावरील उखडलेल्या खडीची समस्या म्हणजेच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी पावसाळ्यात या खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी दुग्धव्यवसाय करतात, त्यामुळे दुधाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.
हेही वाचा