इंदापूर : पुढारी वृत्तसेवा
परकीय सत्तेने वैभवशाली भारताच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून आदर्श न्यायव्यवस्था निर्माण केल्याचे मत डॉ. लक्ष्मण आसबे यांनी व्यक्त केले.
इंदापूर महाविद्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास मंडळ आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्वराज्य दिन साजरा झाला, त्या वेळी डॉ. आसबे बोलत होते.
इंदापूर महाविद्यालय ते नगरपरिषद अशी शिवज्योत रॅली व शिवकालीन क्रीडाप्रकाराचे प्रात्यक्षिकही सादर केले. नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, डॉ. भीमाजी भोर, डॉ. तानाजी कसबे, अभिमन्यू भंडलकर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. शिवाजी वीर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब काळे आणि प्रा. बापू घोगरे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.