पुणे : पुढारी वृत्तसेवा: वैद्यकीय शिक्षणाचा गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला, तर विद्यार्थ्यांचा वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाकडे ओढा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या नाममात्र जागा रिक्त राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व वाढत असलेले दिसून येत आहे. मेडिकल आणि आयुषअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आढावा घेतला, तर यामध्ये पदवीसाठी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग आदी अभ्यासक्रम; तर पदव्युत्तर प्रवेशासाठी पीजी मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आदी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या लोकसंख्येत वयस्कांचे वाढते प्रमाण, वाढता मध्यमवर्ग, अयोग्य जीवनशैलीमुळे रोगांचे प्रमाण वाढणे, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर वाढीव भर तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वेगवान अवलंब, यासह अनेक बाबींमुळे आरोग्य क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या डॉक्टरांची संख्या शहरांमध्येच जास्त आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची अजूनही फार मोठी उणीव जाणवत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेपर्यंत त्यांच्या आरोग्यासाठी खर्या अर्थाने वैद्यकीय सेवा पुरवायची असेल, तर आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी आहे. जुलै महिन्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आवश्यक नीट प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे देखील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय महाविद्यालये 419
उपलब्ध जागा 29 हजार 160
झालेले प्रवेश 27 हजार 947
रिक्त जागा 1 हजार 21
वैद्यकीय महाविद्यालये 153
उपलब्ध जागा 4 हजार 326
झालेले प्रवेश 3 हजार 911
रिक्त जागा 415
हेही वाचा