पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'गुवाहाटीत जाऊन आपली वेगळी संस्कृती दाखवत आहेत. आमदार विकत घेतले; परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ते घेऊ शकणार नाहीत. हे विचार लोकांच्या मनात बिंबलेले आहेत,' असे प्रतिपादन शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी केले. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, प्रशांत बधे, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे उपस्थित होते.
अहिर म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रातील वारकरी पंढरीच्या वाटेवर आहेत आणि दुर्दैवाने काही जण वेगळी भूमिका घेऊन सुरत आणि काही मंडळींनी घर तोडण्याचे काम केले. काही काळ उत्साह दाखविणार्या या बंडखोर आमदारांच्या नशिबी निरुत्साह आल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनमानसात लोकप्रिय ठरलेले आणि महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, हे कुणी नाकारू शकणार नाही.' ' गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वाधिक निधी मतदारसंघात आणला म्हणून फ्लेक्स लावणारे 'आम्हाला निधी मिळत नाही' असे आरोप कसे करू शकतात,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
खासदार बारणे म्हणाले, 'आमदार फोडाफोडीमागे भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना या देशातील विरोधक गिळंकृत करावयाचे आहेत. म्हणून त्यांची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. देशात सत्तेच्या माध्यमातून त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे,' अशा वेळी आपण सर्वांनी एकीने या गोष्टीचा मुकाबला केला पाहिजे.'
हेही वाचा