बारामती : पुढारी वृत्तसेवा
बारामती कृषी विज्ञान केंद्राचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, पुणे यांच्या वतीने कलमी भाजीपाला पिकांच्या प्रात्यक्षिक प्रकल्पाला मंगळवारी (दि. 7) सुरुवात झाली. या प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती व दौंड या तालुक्यातील 100 शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या शेतावर 50 कलमी वांगे व 50 कलमी ढोबळी मिरची यांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जमिनीतून येणार्या बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करणे, पिकामध्ये 20 ते 25 टक्के उत्पादन वाढ व पिकाचा उत्पादन देण्याचा कालावधी वाढविणे हा आहे.
भारतात भाजीपाल्याचे प्रतिवर्षी सुमारे 1629 लाख टन उत्पन्न होते. भारत भाजीपाला उत्पादनामध्ये चीननंतर दुसर्या क्रमांकावर असून जगातील एकूण उत्पादनाच्या 15 टक्के भाजीपाला उत्पादन भारतात होते. त्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. परंतु, सध्या भाजीपाला पीक घेताना अनेक अडचणी येत आहेत.
जमिनीतून येणारे विविध बुरशीजन्य रोग, पिकांवर येणारे जैविक व अजैविक ताण विचारात घेऊन जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये कलमी भाजीपाला पिकांचे प्रात्यक्षिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ यशवंत जगदाळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात कलमी भाजीपाला रोपे शेतकर्यांना देण्यात आली. तीन तालुक्यातील 53 शेतकरी या वेळी उपस्थित होते.