वाडा : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी (दि. 23) झालेल्या पावसानंतर खरीप पेरण्यांना सुरुवात झाली आहे. सुमारे पंधरा दिवस उशिराने पेरण्या होत आहेत. पावसाचे प्रमाण अत्यल्प असले, तरीही शेतकर्यांनी जमिनीतील ओलाव्याच्या आधारावर पेरणी सुरू केली आहे.
जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला, तरीही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खरिपाचा हंगाम लांबला आहे. वाडा, बुरसेवाडी, वाळद, आव्हाट, डेहणे यांसह पंचक्रोशी व परिसरात खरिपाच्या हंगामातील भुईमूग, बाजरी, सोयाबीन, पेरभात आदी पिके घेतली जातात. चालू वर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या रिमझिम पावसावर शेतकरी पेरणी करीत आहेत.
सद्य:स्थितीत जमिनीत जेमतेम दोन ते तीन इंच ओल झाली असून, त्यावर सोयाबीन व भातपिकाच्या पेरण्या सुरू आहेत. भुईमूग, बटाट्यासह तत्सम पिकांना जास्त पावसाची गरज असल्याने या पिकांच्या पेरण्या तसेच लागवडी रखडल्या आहेत. शेतकरी आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी करताना दिसत आहेत. ट्रॅक्टरने पेरणीसाठी 800 ते 900 रुपये प्रतितास घेतले जातात. कमी वेळेत जास्त क्षेत्र पेरणी केले जात असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी करीत आहेत, असे ओंकार वाडेकर यांनी सांगितले.
चालू वर्षी पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकर्यांचे हंगामाचे गणित विस्कळीत झाले आहे. पेरण्या उशिरा झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने खिशाला कात्री लागल्याचे शेतकरी सुभाष वाडेकर यांनी सांगितले.