![कला, साहित्यातून व्हावी सामाजिक प्रश्नांविषयी जागृती : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2Fmedha.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : पुढारी वृत्तसेवा : कलाकार-साहित्यिकांनी देखील सामाजिक विषयांवर लिखाण करीत आपल्या कलेच्या-साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करावी. कलेच्या क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना समाजजीवनाशी तुटलेपण असते. परंतु, त्यांच्याभोवती असलेल्या एका वेगळ्या प्रभावळीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करीत सामाजिक विषयांना जोडून घ्यावे, असे मत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 'तेजस्विनी' पुरस्कार डॉ. मेधा कुलकर्णी यांना रविवारी प्रदान करण्यात आला, त्या वेळी पुरस्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
प्रमोद आडकर आणि भूषण कटककर यांच्या हस्ते पुरस्कराचे वितरण झाले. मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन उपस्थित होत्या. हलाखीच्या परिस्थितीत मुलींना शिकविणार्या माता व वृद्धाश्रमचालिका यांचा सन्मान डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते या वेळी करण्यात आला.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, आजच्या काळात मुली चांगल्याप्रकारे शिकत आहेत, तर मुले मात्र शिक्षणाचे महत्त्व न जाणता वाईट मार्गाला जात आहेत. अशा वेळी मुलींनी जराही मागे न पडता आपल्या आईच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करीत प्रेरणादायी मानले पाहिजे.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात स्वरचित मराठी गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात वर्षा कुलकर्णी, मिलिंद छत्रे, डॉ. मंदार खरे, सुजाता पवार, स्वाती यादव, वैशाली माळी, प्राजक्ता वेदपाठक आदींचा सहभाग होता.
हेही वाचा