ऑनलाइन शिक्षणाने केला विद्यार्थ्यांचा घात
पुणे : पुढारी वृत्तसेवा
बारावीच्या निकालात यंदा उत्तीर्णांचे प्रमाण वाढले, परंतु गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा टक्का मोठ्या प्रमाणात घटला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण सोडून ऑनलाइन शिक्षणाकडे वळावे लागले. याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, परंतु त्यांना चांगले गुण मिळवता आले नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाने बारावीच्या विद्यार्थ्यांचा घात केला असल्याचेे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावी निकालाची राज्याची आकडेवारी पाहिली. राज्यातील 8 लाख 8 हजार 963 विद्यार्थ्यांना 65 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे मूळ संकल्पना समजल्या नाहीत. परिणामी विद्यार्थी जेमतेम गुण मिळवण्यातच यशस्वी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पदवीचा पाया कच्चा राहिला. अकरावी-बारावीत झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची जबाबदारी आता महाविद्यालयांवर असल्याचे स्पष्ट केले आहे.
ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण झाले. या काळात ऑनलाइन शिक्षण मिळाले पण त्यातील संकल्पना त्यांना नीट समजल्या नाहीत. यावर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. यामुळेच विद्यार्थ्यांचा अभ्यास होऊ शकला नाही आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
– डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ
बारावीत गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या घटण्याला ऑनलाइन शिक्षण जबाबदार आहे. यामुळे सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचू शकले नाही. त्यांच्याकडे इंटरनेट सुविधा नव्हती, विजेची सोय नव्हती आणि त्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध नव्हते. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना वर्गात सहभागी होता आले नाही आणि त्यांचा अभ्यासही होऊ शकला नाही. नोकरी करून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना तर त्याचा मोठा फटका बसला. सरकार ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात अपयशी ठरले. याचा सर्व परिणाम विद्यार्थ्यांना सोसावा लागला आहे.
– प्रा. अविनाश ताकवले, माजी प्राचार्य