ऊस गाळपासाठी पुढील वर्ष भयावह; संजय खताळ यांचा इशारा
पुणे : पुढारी वृत्तसेवा
'राज्यात पुढील ऊस गाळप हंगाम 2022-23 मध्ये ऊस पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा असून गाळपाची स्थिती भयावह राहील,' अशी भीती राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी व्यक्त केली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) राज्यस्तरीय साखर परिषदेत यंत्राद्वारे ऊस तोडणी व त्यातील समस्या या विषयावरील चर्चासत्रात बोलत ते होते. या वेळी अध्यक्षस्थानी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते.
जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात मान्सून चांगला राहिल्यास उसाचे क्षेत्र 13.25 लाख हेक्टरहून आणखी वाढून तब्बल 14.50 लाख हेक्टरवर पोहोचेल आणि एकूण 1 हजार 552 लाख मेट्रिक टनाइतके उच्चांकी ऊस गाळप होऊ शकेल, असा अंदाज खताळ यांनी वर्तवला आहे.
खताळ म्हणाले, ब्राझिलमध्ये 6 हजार 550 लाख हेक्टरइतके उसाचे क्षेत्र असून तेथे 92 टक्के ऊस तोडणी ही यंत्राद्वारे होते. भारताला त्यांच्याशी तुलना करायची असेल तर ऊस तोडणी यंत्रास मोठा वाव आहे.
राज्यात कृषी यांत्रिकीकरणाची योजना सबमिशन ऑन अॅग्रिकल्चर मेकॅनायझेशन (एसएएएम) आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीआय) राबविण्यात आली आहे. 2017-18 पासून आरकेव्हीआयमधून अनुदान देण्याची योजना बंद करण्यात आली. राज्यात सध्या 824 ऊस तोडणी यंत्रे उपलब्ध आहेत. पुढच्या वर्षी 160 दिवसांत ऊस गाळप पूर्ण करायचे असेल तर ऑक्टोंबर महिना ते 10 एप्रिल याच काळात ते संपवायला लागेल. त्यामुळे राज्य सरकारने प्रयत्न करून पाचशे ऊस तोडणी यंत्रे खरेदीस आरकेव्हीवायमधून अनुदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा