

नारायणगाव: अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारी वधू व तिच्या टोळीचा नारायणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नारायणगाव पोलिस ठाण्यात शरद गायकवाड यांनी त्यांची लग्नातून आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी सुवर्णमाला वाडकर, मनीषा अडसुळे, संतोष घोडे, भारती मोरे, अश्विनी जगदाळे, सुनील काळे, पंकज डग आणि नामदेव कोल्हे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली. (Latest Pune News)
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की, आरोपींना त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन तपास करून ताब्यात घेतले. त्यांना नारायणगाव पोलिस स्टेशन येथे आणून कसून चौकशी केली. त्या वेळी आरोपींनी अशाच प्रकारे गुन्हा करून अनेक युवकांना आर्थिकदृष्ट्या फसवले असल्याचे पुढे आले.
दरम्यान, या गुन्ह्यातील काही आरोपींनी मध्यस्थी करून लग्न लावून दिले म्हणून ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील एक महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यातील वधू महिला अश्विनी सागर जगदाळे हिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिला 16 वर्षांची मुलगी आणि 14 वर्षांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेने अशा प्रकारे सहा ते सात तरुणांना लग्न करून फसवल्याचेही पुढे आले आहे. यातील चार आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून तीन आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
दाखल गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करणे बाकी असून आरोपींनी जुन्नर, पारनेर, शिरूर इत्यादी ठिकाणी देखील याच प्रकारचे गुन्हे केले असल्याची माहिती तपासात पुढे आली. या गुन्ह्यात एकूण 25 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील करीत आहेत.