शाळांकडून नवीन वेळेची अंमलबजावणी होणार का?

शाळांकडून नवीन वेळेची अंमलबजावणी होणार का?
Published on
Updated on
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊ वाजता भरवाव्यात, असा शासन अध्यादेश नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पूर्वप्राथिमक ते चौथीपर्यंतच्या पाल्य तसेच पाल्यांना तरी दिलासा मिळाला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही शाळा, पालक, विद्यार्थी बस वाहतूक करणार्‍यांपुढे काही अडचणी उभ्या राहत आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी शंभर टक्के होईलच, असे सांगता येत नाही.
लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होणार, या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात काही शाळा सीबीएसई आणि कॉन्व्हेंट स्कूल, जिल्हा परिषद, खासगी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा एकाच सत्रात भरतात त्यांना शासनाच्या निर्णयानुसार वेळ पाळणे शक्य होणार आहे; मात्र महापालिका व काही खासगी शाळा दोन सत्रांत भरतात त्यांच्या भौतिक सुविधांचा विचार करता त्यांच्यापुढे शाळांची वेळ बदलणे अवघड आहे. ज्या शाळांना वेळेत बदल करणे शक्य होणार नाही अशा शाळांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अशा शाळा सकाळी सात वाजता सुरू कराव्या लागतील.
बहुतांश जणांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी काहींच्या मते सकाळची वेळ ही अध्ययनासाठी चांगली असल्याने वेळा बदलू नये, असे मत व्यक्त केले आहे; मात्र, पूर्वीच्या आणि हल्लीच्या कौटुंबिक पद्धतीमध्ये झालेले बदल लक्षात घेता उशिरा झोपल्याने मुलांची झोप अपुरी होते. तसेच काही शाळांमध्ये असणार्या भौतिक सुविधा आणि वर्गखोल्या अपुर्या असल्याने दोन सत्रात भरणार्या शाळांपुढे वेळ बदलण्याची मोठी अडचण येणार आहे. शासन निर्णयानुसार त्यांनी शाळेची वेळ उशिरा केल्यास दुसर्या सत्रातील शाळा सोडण्यास सायंकाळचे सात ते आठ वाजणार आहेत. त्यामुळे दुपारच्या सत्रातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनादेखील त्रासदायक ठरणार आहे.
वेळेबाबत सुवर्णमध्य काढावा
बहुतांश शाळा एसएससी बोर्डाच्या आहेत. ज्या दोन सत्रात चालतात. यांना वीस ते तीस वर्षांपूर्वी परवानगी मिळालेली आहे. नवीन वेळेविषयीचे परिपत्रक सादर करण्यापूर्वी शाळांच्या भौतिक सुविधा आणि वर्गखोल्या याबाबत संबंधित संस्थांकडून माहिती मागवून घेणे गरजेचे होते. जो अध्यादेश आहे त्याचा मुलांच्या लवकर उठण्यावर काय परिणाम होईल याचा विचार करावा. सकाळी नऊऐवजी आठ वाजताची वेळ ठरवणे योग्य होईल. त्यामुळे सर्व शाळांना विचारात घेऊन याबाबत सुवर्णमध्य काढावा.
– राजेंद्र सिंग,सचिव, ईसा संघटना महाराष्ट्र
स्कूल बसेसच्या फेर्‍या कमी कराव्या लागतील
शाळांची वेळ बदलली ही स्वागतार्ह बाब आहे. पण ज्या गाड्या दोन सत्रांमध्ये विद्यार्थी ने – आण करण्याचे काम करतात. त्यांना एक शाळा बंद करावी लागेल. त्यामुळे स्कूल बसचालकांचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे नाईलाजाने भाडेवाढ करावी लागेल. हा आर्थिक बोजा पालकांवर पडेल. पालकांनाही बसचे भाडे परवडणार नाही.
-मोहन जाधव, उपाध्यक्ष,  अखिल महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघ पिं.चि.
शासनाने घेतलेला निर्णय हा पूर्व प्राथमिकसाठी योग्य आहे. ती मुले खूपच लहान असतात. तसेच वेळ बदलल्याने स्कूल बसचे भाडे वाढू शकेल. कारण बसचालक एवढ्या फेर्या मारणार नाहीत; तसेच वेळ बदलल्याने शाळा अभ्यासक्रम कसा पूर्ण करतील, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
– अशिष जोशी, पालक
सरसकट शाळांची वेळ बदलता येणार नाही
शिक्षण आयुक्तांनी शाळांची वेळ बदण्याचे जाहीर केले आहे. पण शासन निर्णयात त्यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे. ज्या शाळांना काही अपरिहार्य कारणास्तव वेळ बदलता येत नसेल त्यांना सूट देण्यात येणार आहे. याबाबत पालिका शाळांचे सर्वेक्षण करावे लागेल. सरसकट शाळांची वेळ बदलता येणार नाही, कारण भौतिक सुविधा एका दिवसात उभ्या करता येत नाहीत.
– विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, पिं.चिं. शिक्षण विभाग

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news