वाघोली (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून वाघोली परिसरात हलका पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुणे-नगर महामार्गावर पुरेशा उपाययोजना केल्या नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने दरवर्षी महामार्गावर पाणी तुंबते. यामुळे लाखो रुपये खर्च करून केसनंद फाटा ते जगतापवस्तीपर्यंत दुतर्फा पावसाळी नाले करण्यात आले. मात्र, या नाल्यांचा काही उपयोग होत नसल्याने पावसाचे पाणी महामार्गावर साचून राहत आहे. अनेकवेळा वाहनांमुळे पाणी अंगावर उडाल्यामुळे वाहनचालक व नागरिकांमध्ये वादही होत असल्याचे दिसून येत आहेत.
परिसरात सध्या होत असलेल्या हलक्या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याचे चित्र दिसून येत असून, काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. यामुळे मोठा पाऊस झाल्यास महामार्गाला पुराचे स्वरूप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत माध्यमांमध्ये वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध होत असूनही, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पावसाळी नाल्यांवर खर्च करण्यात आलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
हेही वाचा :