

मंचर : पुढारी वृत्तसेवा : वळती (ता. आंबेगाव) येथील वाळुंज वस्तीत रस्त्यातील पाईपलाईनच्या खड्ड्यामुळे मिनीबसचा स्टेरिंग करण्या यासाठी असणारा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मिनी बसने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या चारचाकी वाहन व घराला धडक दिल्याने घर व वाहनाचे मोठे नुकसान झाले, तसेच अंदाजे पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात वच्छला किसन भोर (वय ६२) या महिलेचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नारायणराव आगाराची मिनीबस (एमएच १२ आरएन ४९१८) नारायणगावकडून शिंगवेकडे जात होती. मिनीबस भरधाव वेगाने असल्याने वाळुंज वस्ती येथे मिनीबसचा स्टेअरिंग रोड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यात असलेल्या पाईपलाईनच्या खड्ड्यात गेली. त्याचवेळी वच्छला किसन भोर या पंढरपुरला जाणासाठी निघाल्या होत्या. मिनीबसने त्यांना उडवले. यामध्ये त्या गाडी खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला शेडमध्ये उभ्या असलेल्या दत्तात्रय गेनभाऊ वाळुंज यांच्या मालकीच्या क्रुझर (एमएच ०४ एफआर ६१७६) या चारचाकीला जोरदार धडक देऊन शेडजवळ असलेल्या सखाराम बबन वाळुंज यांच्या घराला धडकली. यामध्ये चारचाकी व घराचे मोठे नुकसान झाले, तसेच मिनीबसमधील पाच-सहा प्रवासी जखमी झाल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मंचर आगाराचे आगारप्रमुख बालाजी सूर्यवंशी आणि नारायणगाव आगारप्रमुख वसंत आरगडे यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली.
हेही वाचा