भोर : पुढारी वृत्तसेवा : वन विभागाचा अजब कारभार भोर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. बांधावरील झाड काढायचे असेल तर शेतकर्याला सातबारा, नकाशा मागितला जातो. परंतु, व्यापार्यांना वृक्षतोडीस परवानगी दिली जाते. यामुळे शेतकर्यांमध्ये वन विभागाच्या कारभाराबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित वनरक्षकांची बदली करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
भोर तालुक्यात वरोडी खुर्द परिसरात सागवान झाडांची तोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तोडीसाठी 180 झाडांची परवानगी घेतली होती. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा चौपट झाडे तोडण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असतानाही वन विभागाने दुर्लक्ष केले आहे. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात खर्च करून वृक्ष लागवड करीत आहे, तर दुसरीकडे वन विभागच झाडांची तोड करण्याची परवानगी देत आहे.
बाहेरील व्यापार्यांना वन विभागाकडून वृक्षतोडीसाठी परवानगी दिली जाते. मात्र, स्थानिक शेतकर्यांना शेताच्या बांधावरील झाड तोडायला परवानगी देताना सातबारा आणि नकाशा आणा, असे सांगितले जाते. परवानगी देण्यासाठी शेतकर्यांना नाहक त्रास दिला जात आहे. यामुळे सदर वनरक्षक यांची बदली करण्याची मागणी विसगाव भागातील शेतकर्यांनी केली आहे. बाभळ किंवा निलगिरी तोडण्यासाठी परवानगीची गरज पडत नाही. मात्र, वन विभागाकडून शेतकर्यांना त्रास दिला जात आहे. विविध प्रकारची वृक्षतोड केली जात असून, त्याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वरोडी खुर्द परिसरात सागवान झाडे परवानगीच्या तीन ते चारपट तोडली आहेत. याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा :