

पुणे : पुढारी वृत्तसेवा
कारचा दरवाजा बंद करत असताना कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मुबारक सरदार जमादार (20), विनोद दिलीप धरतीमगर (20) आणि सरदार काशीद जमादार (38, तिघेही रा. भैरोबा मंदीरा शेजारी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत हनुमंत चंद्रकांत गद्रे (48, रा. शिवालय आंगण, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गद्रे कार चालक असून दि. 9 मार्च रोजी रात्री भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ते त्यांच्या कारचा दरवाजा बंद करत असताना तीन जण तेथे आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून हाताने व दगडाने मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेला होता. त्यांच्या दहशतीमुळे नागरीक तेथून पळून गेले; तसेच स्थानिक दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली.
गुन्ह्याचा तपास करत असताना उपनिरीक्षक पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे व पथकातील अमंलदार यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. ते गावी पळून जाणार असल्याचे त्यांना समजले. तिघेही अभिनव कॉलेज जवळ थांबले असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्गन्नाथ कळसकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणिक, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक नितीन शिंदे, रविंद्र चिप्पा, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, सचिन गाडे आशिष गायकवाड यांनी ही कारवाई केली.