आळंदीत आस्थेपुढे व्यवस्था पडतेय कमी : वीज, वाहतूक, पाण्याची समस्या

आळंदीत आस्थेपुढे व्यवस्था पडतेय कमी : वीज, वाहतूक, पाण्याची समस्या

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र व भाविकांच्या मनात आस्था असलेल्या आळंदी शहराच्या मूलभूत सुविधा पुरवणारी व्यवस्था कमी पडताना दिसत आहे. दिवसेंदिवस श्रीमाउलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे. शिवाय लग्न आणि पर्यटकांचा ओढादेखील आळंदीत वाढत आहे. असे असताना महावितरण, पोलिस-वाहतूक विभाग, नगरपरिषद पाणीपुरवठा विभागांना आपल्या अखत्यारित येणार्‍या समस्या सोडविताना दमछाक होत आहे.

शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच, तर पाणी व वीज समस्या घडीचीच बनली आहे. यावर प्रशासकीय अधिकारी राबताना दिसून येत असले, तरी धोरणात्मक निर्णय घेत असताना नगरपरिषद निवडणूक न झाल्याचा मोठा परिणाम त्यावर बसत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने वरिष्ठ पातळीवर शहराच्या समस्यांसाठी धावपळ करणारी यंत्रणा नाही. तर प्रत्येक प्रभागात हक्काने काम मार्गी लावण्याची मागणी करण्यासाठी नगरसेवक नाहीत. त्यामुळे सर्वच व्यवस्था सध्या संथ झाल्याचे चित्र आहे, त्याचा मोठा फटका शहरातील मूलभूत सुविधांना बसत आहे.

भामा-आसखेड धरणातील पाणी जलजीवनकडून वितरण आराखडा उपलब्ध नसल्याने दिवसाआड शहरात वितरित करण्याची वेळ नगरपरिषदेवर आली आहे. बोगस नळजोड नगरपरिषदेची डोकेदुखी बनली आहे. महावितरणचा कारभार तर रामभरोसेच चालला की काय ? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाहतूक विभागाला शहरात बेकायदेशीर पार्किंग, नो पार्किंगवर ठोस कारवाईत यश आलेले नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे.
एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेनुसार चालणारी व्यवस्था लवकरात लवकर नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून व्हावी. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय होऊन रखडलेली कामे मार्गी लागावित, हीच अपेक्षा आळंदीकर करत आहेत.

आळंदीतील काही प्रमुख समस्या

1) शहराचा पाणीपुरवठा पुणे महानगरपालिका जॅकवेलपासून आहे, त्यामुळे धरण ते जॅकवेलपर्यंत पुणे महानगरपालिकेवर आळंदीला अवलंबून राहावे लागत आहे.
2) महावितरण अधिकारी सातत्याने बदलत आहेत, महत्त्वाची कामे त्यामुळे रखडलेली दिसून येतात.
3) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाला वाहने आणि मनुष्यबळ कमी पडत आहेत. नो पार्किंगबाबत नगरपालिका ठराव देखील गरजेचा आहे.
4) शहरात समस्या वाढल्याने भाविक देखील उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news