

पुणे: केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील म्हणजे १५ सप्टेंबर रोजीच्या विक्रीसाठी मंजूर (रीलिज) केलेल्या साखरेपैकी न विकल्या गेलेल्या आणि वितरण न झालेल्या साखरेच्या साठ्याच्या विक्रीस मुदतवाढ देण्याची मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केली आहे.
बँकांचा संप व सलगच्या सुट्या, गणेशोत्सवामुळे माल वाहतुकीस ट्रक उपलब्धतेस अडचणी आल्याने अपेक्षित साखर विक्री होऊ शकलेली नसल्याने ही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात यंदाचा २०२६-२७ चा गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेतला आहे.
त्यानुसार विस्मा संस्थेचे सभासद असलेले आमचे साखर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे पत्र विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रीय सहसचिव अश्विनी श्रीवास्तव यांना पाठवले. त्यामध्ये ही मागणी केली. काही अपरिहार्य कारणांमुळे केंद्र सरकारने दिनांक १५ सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या कारखान्यांच्या मंजूर साखरेच्या वितरणावर परिणाम होत आहे.
त्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा दिनांक ११ सप्टेंबर रोजी संप राहिल्याने बँकिंग कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. तसेच बँकांना सलग तीन दिवस म्हणजे शनिवार रविवार आणि (दि.१२, १३ आणि १४) सोमवारी महाराष्ट्रात गणेश चतुर्थीची सुटी राहिली आहे.
शिवाय साखर वाहतुकीसाठी गणेशोत्सवामुळे ट्रक उपलब्धतेवरही मोठा परिणाम झाला आहे. ही स्थिती साखर उद्योगाच्या वास्तविक, व्यावहारिक आणि नियंत्रणा बाहेर असल्याने विक्रीसाठी मंजूर केलेल्या साखरेपैकी न विकल्या गेलेल्या आणि वितरण न झालेल्या साखरसाठ्याच्या विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, असेही ठोंबरे यांनी पत्रात म्हटले आहे.