विद्यार्थ्यांना दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी! परीक्षा लवकर होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांना दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी! परीक्षा लवकर होण्याची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रांमध्ये विभागून घेणे राज्य मंडळाला अडचणीचे ठरणार असल्याने मंडळाने सध्याच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ताळेबंद करून दोनदा घेण्याबाबत विचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा 15 ते 20 दिवसांनी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्याला फेब—ुवारी आणि जून अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शैक्षणिक धोरणात दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रनिहाय घेण्याबाबत सूचविले आहे. यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सत्रनिहाय परीक्षा घेण्याची चाचपणी केली. मात्र, त्याऐवजी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याबाबत त्यांनी नव्याने विचार सुरू केला आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समोर आले आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोनदा घेण्यात येतात.

फेब्रुवारी-मार्च सत्रातील परीक्षेच्या निकालात कमी गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण होण्याची संधी मिळते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून आगामी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होणारी परीक्षा 15 ते 20 दिवस अगोदर म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. असे झाल्यास बारावीची परीक्षा वेळेत संपून निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर होईल. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा (पुरवणी परीक्षा) होतील. त्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येईल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतील, असे गोसावी यांनी
स्पष्ट केले.

संवाद साधून नियोजन

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्याला दोनदा परीक्षेची संधी मिळते. सर्वाधिक गुण असलेल्या परीक्षेचे गुण हे पुढे जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी ग्राह्य धरण्यात येतात. राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे दोन्ही यंत्रणांशी संवाद साधून परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे. त्यानंतर दोनदा परीक्षा शक्य आहेत.

सत्रनिहाय परीक्षा अडचणीच्या

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे 32 लाख विद्यार्थी बसतात. ही संख्या खूप मोठी आहे. अशावेळी परीक्षा ही विभागून सत्रनिहाय घेतल्यास शिक्षक, कर्मचारी आणि राज्य मंडळाच्या अधिकार्‍यांचा वेळ हा परीक्षेचे आयोजन करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंत जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया सत्रनिहाय करायचे असल्यास भरपूर वेळ जाणार आहे. याचा विपरीत परिणाम शैक्षणिक अध्यापनावर होऊ शकतो, असेही गोसावी यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news