मार्केट यार्डात कडकडीत बंद; फळे, फुले, पान, केळी बाजारातील व्यवहार ठप्प
पुणे : पुढारी वृत्तसेवा : माथाडी कायद्याची राज्यभर अंमलबजावणी करावी तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे 2018 चे विधेयक मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगार संघटनांच्या वतीने सोमवारी (दि. 26) बाजार आवारात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे मार्केट यार्डात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. श्रीछत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. पुण्यासह राज्यभरातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची आवक झाली नाही.
परराज्यातील शेतीमालाची सोमवारी आवक झाली. मात्र, पुणे विभागातील शेतकर्यांनी शेतीमाल विक्रीस पाठविला नाही. बंदमध्ये श्रीछत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली. माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी तसेच लोकशाही पद्धतीने बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा

