

शिवाजी शिंदे
पुणे: सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी आणि आनंदनगर भाग हा नदीपात्रावर झालेल्या मोठ्या अतिक्रमणांमुळेच सतत पाण्याखाली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलसंपदा विभाग म्हणतो, नदीपात्रातील अतिक्रमणे हटविणे महापालिकेचे काम आहे, तर महापालिका म्हणते, अनेक बांधकामांना पूर्वी परवानगी देण्यात आली आहे. या वादात सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना पुराचा धोका कायम आहे.
जलसंपदा विभाग हा शहरात पाऊस येताच धरण साखळीतील पाण्याचा अंदाज घेऊन मुठा नदीपात्रातून पाणी सोडण्याचा निर्णय घेते. त्याच्या म्हणण्यानुसार, नदीपातात ब्ल्यू लाईनमध्ये गेल्या १० ते १२ वर्षांत अनेक अतिक्रमणे झाली आहेत. ते काढण्याचे काम महापालिकेचे आहे. ही कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत नदीचा प्रवाह सुरळीत होणार नाही. पूर्वी ६० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला तरी शहरातील सिंहगड रस्त्यावर असा धोका नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ३५ ते ४० हजार क्युसेक विसर्गात सिंहगड परिसर पाण्याखाली जात आहे.
यंदाची परिस्थिती अशी होती...
जलसंपदा विभागाच्या खडकवासला साखळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले की, नदीपात्रातील अतिक्रमणे हटविली पाहिजेत. पूररेषेतील बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे. यंदा २७ हजार क्युसेकने पाणी सोडण्याआधी बंडगार्डन बंधार्यात ६० हजार क्युसेकचा प्रवाह होता. तसेच मुठा नदीपात्रातही भरपूर पाणी आले होते. महापालिकेला नदीपात्राचा अंदाज आम्ही देतो. मात्र, शहराच्या आजुबाजूचे पाणलोट क्षेत्रातून सुमारे जो पाण्याचा भराव येतो. त्याचा अंदाज महापालिकेला येत नाही. त्यामुळे अशी स्थिती वारंवार येत राहील. यात जलसंपदा विभागाची कोणतीही चूक नाही.
नदीची रुंदी कमी झाली
पूर्वी १८० ते २५० मीटरचे पात्र होते. सध्या ते ९० ते १३० मीटर इतकेच रुंद आहे.
म्हणजेच ३० ते ५० टक्क्यांपर्यंत नदीपात्राचा गळा अरुंद झालेला आहे.
पूररेषेतील अतिक्रमणे...
निवासी इमारती, सोसायट्या, सीमाभिंती, पार्किंग रस्ते, भराव आणि इतर अतिक्रमणे
समितीचे निष्कर्ष...
नदीपात्रात राडारोडा टाकणे
अनधिकृत बांधकामे
बेसुमार वृक्षतोड
अरुंद पुलांचे बांधकाम
...असे आहेत वादाचे मुद्दे
जलसंपदा विभाग म्हणतो, नदीपात्रातील अतिक्रमणे हटविली पाहिजेत, पूररेषेतील बांधकामांवर कारवाई आवश्यक
महापलिका म्हणते...
अनेक बांधकामांना पूर्वी परवानगी देण्यात आली.
पुनर्वसनाशिवाय मोठ्या प्रमाणावर कारवाई करणे कठीण आहे.
या भागात आहेत अतिक्रमणे....
खडकवासला धरण परिसरात नदीकाठावरच अनेक
ठिकाणी अनधिकृत भराव, नांदे परिसर नदीलगत बांधकामे
किरकिटवाडी भराव व कुंपणे, धायरी नदीकाठावरील विकास कामे
आनंदनगर भागात निवासी प्रकल्पामुळे नदीची रुंदी झाली कमी
माणिकबाग भरावासह अनेक सीमाभिंतींचे अतिक्रमण
विठ्ठलवाडी झोपडपट्ट्यांसह अनेक अनधिकृत बांधकामे
राजाराम पुलाजवळ अनेक अडथळे